तुळजापूर: शहरातील हनुमान नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ भांडणाचे रूपांतर हत्येत झाले असून, एका ४० वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव कस्तुरा गणेश पवार (वय ४०, रा. हनुमान नगर, तुळजापूर) असे आहे. ही घटना ६ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री ९:०० ते ७ फेब्रुवारी २०२६ च्या सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी गब्बर उर्फ वसिम दिलावर पठाण (रा. पापनास नगर, तुळजापूर) याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कस्तुरा पवार यांच्या राहत्या घरी (पत्र्याच्या शेडमध्ये) जाऊन कशाच्या तरी सहाय्याने त्यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले.
याप्रकरणी तानाजी बापुराव साळुंखे (वय ४१, रा. तुळजापूर) यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गब्बर उर्फ वसिम दिलावर पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.







