अखेर ती बहुप्रतीक्षित ‘परदेशवारी’ संपली! आमदार राणा पाटील, ‘माऊली’ अर्थात जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील आणि त्यांचे सुपुत्र तथा ‘भावी खासदार’ मल्हार पाटील यांचे धाराशिवमध्ये जंगी पुनरागमन झाले आहे. पण साहेब आणि फॅमिली धाराशिवमध्ये पाय ठेवतात न ठेवतात, तोच त्यांच्या ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने पुन्हा एकदा पक्षात नवा राडा सुरू केला आहे. यावेळी विषय आहे तो सोशल मीडियावरील ‘भक्तीचा’!
आले रे आले… ‘मल्हार पर्व’ आले! पीएचे थेट फर्मान!
साहेबांची गाडी धाराशिवमध्ये धडकताच, मल्हार पाटील यांच्या पीए (PA) साहेबांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना एक अधिकृत ‘फर्मान’ काढले. फर्मान काय होते? तर सर्वांनी आपापल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपवर फक्त आणि फक्त मल्हार दादांचे स्टेटस आणि रील्स ठेवायचे!
या ‘स्टेटस मोहिमे’साठी खास दोन टॅगलाईन्स (Slogans) पुरवण्यात आल्या होत्या:
१. “आरंभ नव्या युगाचा… कधीही न संपणाऱ्या मल्हार पर्वाचा…”
२. “जनसेवेचा नवा अध्याय मल्हार पाटील”
(या ‘मल्हार पर्वा’च्या भपकेबाज हवा निर्मितीचे आणि जनसेवेच्या नव्या अध्यायाचे पुरावे तुम्ही थेट या इमेजेसमध्ये पाहू शकता!)

निष्ठावंतांचा थेट नकार आणि ‘कोल्ड वॉर’ सुरू!
पीएचे हे फर्मान येताच पक्षात थेट दोन गट पडले. जे पक्षात नव्याने आले आहेत आणि जे राणा व मल्हार पाटील यांचे अधिकृत ‘बगलबच्चे’ आहेत, त्यांनी तात्काळ आदेशाचे पालन करत आपले व्हॉट्सॲप आणि फेसबुक मल्हार दादांच्या फोटोंनी रंगवून टाकले.
पण दुसरीकडे, ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत, त्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र हे स्टेटस ठेवण्यास चक्क आणि स्पष्ट नकार दिला! “पक्षाचे काम करू, पण कुणाच्या घरची चाकरी आणि भावी खासदारांची भक्ती करणार नाही,” हा कडक संदेश निष्ठावंतांनी आपल्या कृतीतून दिला. यामुळे भाजपच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये आता उघडपणे ‘कोल्ड वॉर’ (Cold War) रंगल्याचे चित्र आहे.
‘शिकाऊ पैलवान’ विरुद्ध ‘वस्ताद’! कोरे यांचा सणसणीत टोला
या कोल्ड वॉरमध्ये खरी ठिणगी टाकली ती माजी नगरसेवक व्यंकटेश कोरे यांनी! कोरे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे अत्यंत खास मित्र मानले जातात. निष्ठावंतांची बाजू घेत कोरे यांनी मल्हार पर्वाच्या या ‘हवेची’ एकाच वाक्यात हवा काढून टाकली.
कोरे यांनी आपल्या फेसबुकवर दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा एक रुबाबदार फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये असा काही बाण सोडला की तो थेट राणा साहेबांच्या घरात जाऊन लागला. त्यांनी लिहिले:
“शिकाऊ पैलवानानी तालमीच्या #वस्तादाला, ओव्हरटेक करायला बघायचं नसतं…! कळतं ना 💪💪”
(व्यंकटेश कोरे यांचा हा सणसणीत राजकीय टोला तुम्ही मध्ये पाहू शकता.)

‘वस्ताद’ दत्ताभाऊ अन् ‘शिकाऊ पैलवान’ मल्हार दादा?
राजकीय वर्तुळात आता या एकाच पोस्टची खमंग चर्चा सुरू आहे. या पोस्टमधील ‘शिकाऊ पैलवान’ म्हणजे नुकतेच राजकारणात उतरलेले आणि ‘भावी खासदार’ म्हणून मिरवणारे मल्हार पाटील, तर ‘तालमीचा वस्ताद’ म्हणजे गेली अनेक वर्षे पक्षासाठी राबणारे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि जुने निष्ठावंत, असा थेट अर्थ काढला जात आहे.
थोडक्यात काय, तर “पक्षात काल आलात, तर कालच्यासारखंच राहा. थेट वस्तादाला (निष्ठावंतांना) ओव्हरटेक करायला जाऊ नका, नाहीतर आस्मान दाखवू!” हा अत्यंत स्पष्ट आणि कडक इशारा यातून देण्यात आला आहे.
परदेशातून आल्या आल्या ‘मल्हार पर्व’ सुरू करण्याचा साहेबांचा डाव निष्ठावंतांनी असा काही हाणून पाडलाय, की आता या ‘कोल्ड वॉर’चे रूपांतर थेट ‘महायुद्धात’ कधी होते, याकडेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!





