धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांची जनावरे (म्हशी) चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ८ म्हशी आणि चोरीसाठी वापरलेली वाहने असा एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे म्हैस चोरीचे तब्बल १३ गुन्हे उघडकीस आले आहेत
गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि तपास:
-
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी लासोना शिवारातील एका शेतकऱ्याच्या ५ म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
धाराशिव जिल्ह्यात जनावरे चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
-
तपासादरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक कासार आणि त्यांच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील एक संशयित व्यक्ती आणि त्याचे वाहन चोरीच्या परिसरात आले होते.
-
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नन्नवरे वस्ती, नेकनूर, ता. जि. बीड) याला नेकनूर येथून ताब्यात घेतले.
-
त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून त्याचा दुसरा साथीदार शंकर सुरेश चव्हाण (रा. ढोकी) यालाही अटक करण्यात आली आहे.
आरोपींची कबुली आणि जप्त मुद्देमाल:
-
या आरोपींनी आतापर्यंत येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवीमार्डी, सुरतगाव, वैराग आणि माणकेश्वर शिवार या ठिकाणांवरून म्हशी चोरल्याची कबुली दिली आहे.
-
धाराशिव जिल्ह्यातील एकूण १३ म्हशी चोरीचे गुन्हे केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे.
-
पोलिसांनी आरोपींकडून ८ म्हशी, गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण १२,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींचे इतर साथीदार आणि चोरीला गेलेल्या आणखी काही म्हशींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील अंमलदार (शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव) यांनी ही कारवाई यशस्वी केली.






