धाराशिव: महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १)’ राबविण्यात येत आहे. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरांच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना थेट त्यांच्या गावातच प्रशासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ (Single Day Service Delivery). म्हणजेच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवा आणि दाखले एकाच दिवसात दिले जातील. यामुळे नागरिकांचा तहसील किंवा इतर शासकीय कार्यालयांत येण्या-जाण्याचा वेळ आणि पैसा वाचेल, तसेच त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लागतील.
शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
या शिबिरामध्ये ग्रामस्थांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली जाणार आहेत, ज्यामध्ये खालील सेवांचा समावेश आहे:
-
७/१२ वाचन आणि मोहिमेअंतर्गत नोंदींची तपासणी.
-
विविध सामाजिक व आर्थिक योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे.
-
विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रांची नोंदणी आणि पूर्तता.
-
मंजूर झालेले फेरफार आणि खाते उतारे/नोंदी त्वरित उपलब्ध करून देणे.
-
भूमी व तुकडेबंदी कायदा आणि अकुशल तारणगी सुधारणांबाबत शासकीय मार्गदर्शन.
असे असेल शिबिरांचे वेळापत्रक:
तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि शहरात पुढीलप्रमाणे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे:
-
७ मार्च २०२६: केशोगाव
-
१२ मार्च २०२६: बेंबळी
-
१४ मार्च २०२६: तेर
-
१७ मार्च २०२६: करजखेडा
-
१८ मार्च २०२६: ढोकी
-
२५ मार्च २०२६: येडशी
-
८ एप्रिल २०२६: आंबेजवळगाव
-
१० एप्रिल २०२६: जागजी
-
१७ एप्रिल २०२६: पाडोळी
-
८ मे २०२६: धाराशिव ग्रामीण
-
१५ मे २०२६: धाराशिव शहर
तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन
या विशेष मोहिमेबाबत बोलताना तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सांगितले की, “सर्व ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरांचा लाभ घ्यावा. हे शिबिर केवळ नोंदी पूर्ण करण्यासाठी नसून आपल्या दैनंदिन समस्या, जमिनीचे वाद, आणि योजनांचे अर्ज त्वरित मार्गी लावण्यासाठी आहे.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “गावातील प्रत्येक समस्येची प्रशासनाकडून थेट दखल घेतली जाईल. यातून केवळ सेवा देणे हा हेतू नसून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढवणे आणि त्यांचे जीवन सुलभ करणे हा आमचा प्रयत्न आहे. सर्वांनी यात सहभागी होऊन आपले हक्क व सुविधांचा लाभ घ्यावा.”
या अभियानामुळे गावपातळीवरील प्रशासकीय कामे गतिमान होणार असून, धाराशिव तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.







