धाराशिव | धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील जीर्ण आणि असुरक्षित वर्गखोल्यांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, 203 नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 22.19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शाळांमधील धोकादायक वर्गखोल्यांचा मुद्दा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेली माहिती सभागृहात सादर केली.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका या भागांतील 287 शासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये जीर्ण व असुरक्षित वर्गखोल्यांची नोंद करण्यात आली आहे.
या समस्येच्या निराकरणासाठी समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयातून आर्थिक वर्ष 2025-26 आणि 2026-27 या कालावधीत 203 नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी एकूण 2,219.11 लाख रुपये (22.19 कोटी रुपये) मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तसेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीच्या माध्यमातून शाळांतील पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीर्ण शाळा इमारतींचे सुरक्षा लेखापरीक्षण करून असुरक्षित इमारतींची तातडीने दुरुस्ती किंवा पाडकाम करण्याचे तसेच सुरक्षित घोषित होईपर्यंत अशा इमारतींचा वापर बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या निधीमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शाळांमध्ये सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित शिक्षणाचे वातावरण निर्माण होणार आहे.





