धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून तीन मुलांसह उडी घेतलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पोळ यांच्या आत्महत्येप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी पोळ यांचे वडील तानाजी मोहिते (रा. व्हंताळ, ता. उमरगा ) दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती, सासू, सासरे आणि आत्या अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी तक्रारीत केल्याची माहिती आहे.
गुरुवारी दुपारी नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून अश्विनी यांनी आपल्या तीन मुलांसह उडी घेतली होती. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अभिजित यांचा मृत्यू झाला होता. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुली वीरा आणि क्रांती गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान क्रांती हिचाही मृत्यू झाला, तर वीरा गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
अश्विनी पोळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असून त्या महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुस्ती क्षेत्रासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या चौघांवर करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.





