धाराशिव : जिल्ह्यातील उमरगा, कळंब, धाराशिव शहर आणि तुळजापूर येथे चोरीच्या चार स्वतंत्र घटना घडल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर व पत्रे उचकटून रोख रक्कम व साहित्य लंपास केले, तर दोन ठिकाणी दुचाकी व मोबाईल चोरीला गेला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरगा : दुकानाचे शटर उचकटून १५ हजारांची चोरी
उमरगा येथील आर्यन स्टिल, चिंचोळे यांच्या महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने उचकटून दुकानात प्रवेश केला. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्याने काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सुरेशकुमार फुलचंद परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३४(१), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब : पान स्टॉलमधून ८ हजार ३४४ रुपयांचा माल चोरीला
येरमाळा-कळंब मार्गावर मानधने पेट्रोल पंपासमोरील ७/१२ पान स्टॉलचा पत्रा कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. १ सप्टेंबर रात्री आठ ते २ सप्टेंबर सकाळी नऊ या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी बिस्कीट, शेंगदाणा चक्की, चिप्स, चॉकलेट, नमकीन-कुरकुरे तसेच स्प्राईट आणि थम्सअपचे बॉक्स असा एकूण ८ हजार ३४४ रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी आश्रुबा मस्सा राऊत यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव : एलपीजी गॅस पंपाजवळून ५० हजारांची दुचाकी लंपास
धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौक परिसरात एलपीजी गॅस पंपाजवळ उभी केलेली हिरो युनिकॉर्न मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. एमएच २५ बीई ४१५७ क्रमांकाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी २१ ऑगस्टच्या रात्री ११ ते २२ ऑगस्टच्या पहाटे पाच या कालावधीत चोरीला गेली. याप्रकरणी प्रतिक पांडुरंग आटपाडे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तुळजापूर : आठवडी बाजारातून ४० हजारांचा मोबाईल चोरीला
तुळजापूरच्या आठवडी बाजारातून सोनाली अविनाश जाधव यांचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी सोनाली जाधव यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे.




