कळंब : कळंब तालुक्यातील ईटकुर येथील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना अज्ञात व्यक्तीने विषारी औषध देऊन मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, शेतकऱ्याचे अंदाजे ४८ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अरुण आडसुळ (वय ३६ वर्षे, रा. ईटकुर, ता. कळंब, जि. धाराशिव) यांचे पाथर्डी-ईटकुर रोडवर गट नं. ७०३ मध्ये ‘माऊली ॲग्रो फार्म’ आहे. गुरुवारी, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास त्यांच्या फार्मवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. या अज्ञाताने जाणीवपूर्वक फार्ममधील कोंबड्यांच्या खाण्यात किंवा पाण्यात विषारी औषध टाकले.
या विषप्रयोगामुळे फार्ममधील १६० कोंबड्या मरण पावल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गणेश आडसुळ यांचे सुमारे ४८,००० रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आडसुळ यांनी शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी २०२६) कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
गणेश आडसुळ यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून, कळंब पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. हा खोडसाळपणा कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.







