ढोकी: शेतात जाण्याच्या किरकोळ कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवार, लोखंडी रॉड आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जवळील गोवर्धनवाडी शिवारात घडली. या घटनेत तरुणासह भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या नातेवाईकालाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद कालिदास आंबाड (वय २१, रा. जयभवानी नगर, ढोकी, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षद हा १२ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोवर्धनवाडी शिवारामधील श्रीकृष्ण खोत यांच्या शेतात (गट नं. १४) गेला होता. यावेळी ‘शेतात का आलास’, या कारणावरून अविनाश अनुरथ खोत, श्रीकांत अनुरथ खोत (दोघे रा. गोवर्धनवाडी) आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून हर्षदला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी हर्षदला लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड, तलवार, कोयता आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार पाहून हर्षदचे साडू पोपट हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत तलवारीने मारहाण करून जखमी केले. तसेच, ‘पुन्हा शेतात आला तर जिवे ठार मारू’, अशी धमकी आरोपींनी दिली.
या भयानक घटनेनंतर हर्षद आंबाड यांनी १४ मार्च रोजी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अविनाश खोत, श्रीकांत खोत आणि इतर तीन आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), ३५२(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.





