राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पण धाराशिवमध्ये जे घडलंय, ते पाहून एखाद्या धम्माल कॉमेडी सिनेमाचे दिग्दर्शकही म्हणतील, “क्या बात है, ही स्क्रिप्ट आम्हाला का नाही सुचली?” राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा असा काही गाजलाय की, विचारता सोय नाही! सत्कार मंचावर, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत आणि मित्रपक्षाचे नेते पडद्यामागून रिमोट कंट्रोल चालवत आहेत… असा हा सगळा ‘मल्टिस्टारर ब्लॉकबस्टर’ चित्रपट होता!
चला तर मग, या ‘हटके’ दौऱ्याचा थोडा ‘रिव्ह्यू’ घेऊया…
सीन १: “मातोश्रीचे दरवाजे बंद” ते “विमानतळाचे गेट बंद”!
लक्षात आहे ना? शिवसेनेत बंड करताना सर्वात मोठं कारण काय दिलं होतं? “उद्धव साहेब भेटत नाहीत, मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी बंद असतात!” आता नियतीचा खेळ बघा. शिंदे साहेब धाराशिवला आले, तेव्हा त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना भेटायला विमानतळावर गेले. पण तिथे काय? तर आमदारांना आणि त्यांच्या लेकरा-बाळांना ‘व्हीआयपी पास’, आणि स्वतःच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना थेट पोलिसांचा ‘बाऊन्सर’! विमानतळाचे गेटच कार्यकर्त्यांसाठी बंद करण्यात आले. म्हणजे साहेब कालही भेटत नव्हते आणि साहेब आजही भेटत नाहीत, फक्त साहेबांचं नाव बदललंय!
सीन २: पाहुणचार पोलिसांचा, ‘समोरासमोर भिडण्याची’ भाषा स्वतःच्याच नेत्यांना!
शिंदे साहेबांच्या स्वागताला कार्यकर्ते फुलांचे हार घेऊन जाणार होते, पण त्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यात ‘नजरकैदेचा’ पट्टा घातला! तिकीट वाटपातला घोळ विचारण्यासाठी युवासेनेचे अविनाश खापे, नितीन पाटील यांना थेट घरातूनच उचलून पोलीस ठाण्यात ‘व्हीआयपी’ दर्शन देण्यात आलं. तर प्रवक्ते योगेश केदार यांच्या घरावर असा काही पहारा लावला, जणू ते दाऊदचे उजवे हातच आहेत!
यावर संतापलेले माजी जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे थेट ‘सिंघम’च्या स्टाईलमध्ये कडाडले, “हिंमत असेल तर समोरासमोर भिडा!” आता प्रश्न असा आहे की, हा डायलॉग त्यांनी नक्की कोणाला मारला? विरोधकांना की स्वतःच्याच पक्षनेतृत्वाला? (हे गूढ अजून उकललेलं नाही!)
सीन ३: ‘शिंदे’ गटाची शिवसेना की ‘राणा पाटील’ यांची प्रायव्हेट लिमिटेड?
पिक्चरमध्ये खरा ट्विस्ट तर इथेच आहे! स्वतःच्याच कार्यकर्त्यांना का कोंडलं? तर म्हणे यात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा हात आहे. शिंदे गटाचेच प्रवक्ते योगेश केदार यांनी हा ‘बॉम्ब’ फोडलाय. म्हणजे, पक्ष शिंदेंचा, मुख्यमंत्री शिंदेंचा, पण रिमोट कंट्रोल मित्रपक्षाच्या आमदाराकडे? हे म्हणजे “लगीन घरात नवऱ्यापेक्षा भटजीचाच रुबाब जास्त” असं काहीसं झालंय.
सीन ४: उबाठा गटाची ‘पॉपकॉर्न’ खात मज्जा!
समोरच्याच्या घरात भांडण लागलं की शेजाऱ्यांना जी मजा येते, तीच मजा सध्या ठाकरे गटाला (उबाठा) येत आहे. युवासेनेचे संजय भोरे यांनी तर थेट ‘नक्षलवाद्यांचा’ संदर्भ देत शिंदेंची फिरकी घेतली. “जे साहेब गडचिरोलीत नक्षलवाद्यांना घाबरले नाहीत, ते धाराशिवमध्ये स्वतःच्याच कार्यकर्त्यांना का घाबरले?” असा बाण त्यांनी सोडला. तर दुसरीकडे, तानाजी जाधवर यांनी तर थेट मार्केटच डाऊन केलं, “ज्या पक्षात स्वतःच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांत डांबतात, तिथे कोणता शहाणा जाईल?” (म्हणजेच, आमच्यातून कुणी तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही!)
सीन ५: ‘ऑपरेशन टायगर’चा झाला ‘फुसका बार’!


या दौऱ्याचा क्लायमॅक्स होता ‘ऑपरेशन टायगर’! अशी जोरदार हवा होती की ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार. पत्रकार संघाच्या कार्यक्रमात दोघे एकाच मंचावर येणार होते. अख्खा जिल्हा डोळे फाडून वाट बघत होता. पण ओमराजेंनी अशी काही ‘गुगली’ टाकली की शिंदे साहेबांचा ‘क्लीन बोल्ड’ झाला! ओमराजेंनी कार्यक्रमाला थेट दांडीच मारली. “तुमच्या पक्षात तुमचेच कार्यकर्ते सुरक्षित नाहीत, तिथे मी कशाला येऊ?” असा न बोलता दिलेला हा ‘सणसणीत चिमटा’ होता. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’चं थेट ‘ऑपरेशन म्याऊ’ झालं!
थोडक्यात काय तर…
एकनाथ शिंदे यांचा हा धाराशिव दौरा त्यांच्याच पक्षासाठी ‘डॅमेज कंट्रोल’ कमी आणि ‘सेल्फ डॅमेज’ जास्त ठरला. स्वतःच्याच लोकांना न भेटता, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन साहेबांनी धाराशिवमध्ये जो ‘नवा आदर्श’ प्रस्थापित केलाय, त्याची चर्चा आता गल्लीगल्लीत रंगत आहे. शेवटी काय, राजकारणात स्वतःच्या सावलीला घाबरण्याची वेळ येते, तेव्हा असली धम्माल ‘स्क्रिप्ट’ जन्माला येते!






