धाराशिव: जिल्ह्यातील अनेक भागांत मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. या अस्मानी संकटात वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या बळीराजावर या अवकाळीने आणखी एक मोठा आघात केला असून, बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
-
केशेगाव, बामणी, धारूरमध्ये गारांचा खच
-
शेतात काढून ठेवलेली ज्वारी, कडबा आणि फळबागांचे मोठे नुकसान
-
शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप; पंचनामे करण्याची मागणी
-
हवामान विभागाचा पुढील काही दिवस पावसाचा इशारा
धाराशिव तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत मंगळवारी हवामानात अचानक बदल झाला. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. धाराशिव तालुका परिसरात गारांचा पाऊस झाला. विशेषतः केशेगाव, बामणी, धारूर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गावांमध्ये गारांचा अक्षरशः खच साचलेला पाहायला मिळाला. यासोबतच तेर, वानेवडी आणि ढोकी परिसरातही जोरदार गारपीट सुरू होती.
कष्ट पाण्यात गेले
हातातोंडाला आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. फळबागा, उभी पिके आणि शेतीमालावर या संकटाचा गंभीर परिणाम झाला आहे. शेतात काढून ठेवलेली ज्वारी आणि कडबा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी झाले असून, शेतकऱ्यांचे अनेक महिन्यांचे कष्ट एका क्षणात मातीत मिसळले आहेत. आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत
या भीषण परिस्थितीत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावी आणि नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पुन्हा पावसाचा इशारा
दरम्यान, एकीकडे रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरूच होता, तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नसून, शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.






