धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, लग्नाची विचारणा केली असता तरुणीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला तिच्याच गावातील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर १४ जून २०२४ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत त्याने तिला विश्वासात घेऊन लॉजवर नेले व तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
बऱ्याच दिवसांनंतर पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, आरोपीने लग्नास नकार देत तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “पुन्हा लग्नाचा विषय काढलास तर तुला जिवे ठार मारीन,” अशी गंभीर धमकीही त्याने दिली.
या सततच्या त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून अखेर पीडित तरुणीने मंगळवारी (ता. २१ एप्रिल २०२६) आनंदनगर पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली. तिने दिलेल्या प्रथम खबरीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






