भूम : ‘तू आमचे शेत का विकले?’ अशी विचारणा करत झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका ५६ वर्षीय प्रौढाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चिंचपूर ढगे (ता. भूम) येथे घडली. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २१) तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिमान संदिपान ढगे (वय ५६, रा. चिंचपूर ढगे, ता. भूम, जि. धाराशिव) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. तर महेश मोहन येडे, समाधान सुरेश येडे आणि विलास युवराज येडे (सर्व रा. चिंचपूर ढगे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचपूर ढगे येथील भैरू शिंदे यांच्या रसवंतीजवळ फिर्यादी अभिमान ढगे हे उपस्थित होते. त्यावेळी नमूद केलेल्या तीनही आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले. ‘तू आमचे शेत का विकले?’ या कारणावरून त्यांनी ढगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर उपचाराअंती, अभिमान ढगे यांनी मंगळवारी (ता. २१ एप्रिल) भूम पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून महेश येडे, समाधान येडे आणि विलास येडे या तिघांविरुद्ध भूम पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलिस करत आहेत.






