ढोकी : जुन्या वादाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना तुगाव (ता. धाराशिव) येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असून, ढोकी पोलीस ठाण्यात तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री भैरवनाथ गडकर (वय ४५, मूळ रा. तुगाव, हल्ली मुक्काम माझगाव, मुंबई) असे मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. तर नेताजी शिवाजी गडकर, शिवाजी गडकर, धनाजी गडकर, अंकुश गडकर, बबन गडकर, सुनंदा गडकर, पार्वती गडकर, सुचिता गडकर, बालिका गडकर, प्रियांका गडकर आणि संभाजी गडकर (सर्व रा. तुगाव, ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
जयश्री गडकर या मूळच्या तुगाव येथील असून सध्या त्या मुंबईतील माझगाव येथे राहतात. सोमवारी (ता. २० एप्रिल) रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या तुगाव येथे असताना नमूद आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी जयश्री यांना गाठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्या जखमी झाल्या. याशिवाय आरोपींनी त्यांना ‘तुला जिवे ठार मारू’ अशी गंभीर धमकीही दिली.
या हल्ल्यानंतर जयश्री गडकर यांनी मंगळवारी (ता. २१ एप्रिल) ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून सर्व ११ आरोपींविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, १९१(२), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ढोकी पोलीस करत आहेत.






