परंडा : कत्तलीच्या उद्देशाने एका पिकअप वाहनातून अत्यंत निर्दयीपणे ४० गोवंशीय वासरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार परंडा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. करमाळा ते धाराशिव रोडवरील रोसा गावाजवळ गुरुवारी (दि. २३) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वासरांसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा-धाराशिव मार्गावरून एका पिकअप वाहनातून (क्र. एमएच १२ डी.टी. ११२२) गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोसा गावाजवळ पाळत ठेवून सदरील वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये अत्यंत कमी जागेत तब्बल ४० गोवंशीय वासरे दाटीवाटीने कोंबून भरल्याचे आढळून आले.
वासरांचे तोंड आणि पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. त्यांना साधी हालचालही करता येणार नाही अशा वेदनादायी आणि निर्दयी स्थितीत त्यांना कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येत होते. पोलिसांनी तातडीने या मुक्या प्राण्यांची सुटका केली. या कारवाईत २ लाख रुपये किमतीची ४० वासरे आणि वाहन असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी परंडा पोलिसांनी पिकअप चालक तौफिक निसार मुलानी (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे. सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर परंडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९(ब), ११, तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१) व प्राण्यांचे परिवहन नियम ४७, ५४, ५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.







