भूम : शहरातील वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिससमोरून एका ५४ वर्षीय प्रौढास अमानुष मारहाण करून पांढऱ्या रंगाच्या ईको कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २५) दुपारी घडली. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एका महिलेसह चार अज्ञात आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे भूम शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शिवाजी मालोजी ओगले (वय ५४, रा. कुसुमनगर, भूम, जि. धाराशिव) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी शीतल शिवाजी ओगले (वय ३९) यांनी भूम पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २५) दुपारी सव्वा एक (१३.२३ वा.) वाजेच्या सुमारास शिवाजी ओगले हे भूम येथील पोस्ट ऑफिससमोर होते. त्यावेळी तिथे अचानक एक अनोळखी महिला आणि तीन अज्ञात इसम आले. त्यांनी शिवाजी ओगले यांना विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या ईको कारमध्ये (क्र. एमएच १६ सीव्ही १६९७) कोंबले आणि त्यांचे अपहरण करून कुठेतरी अज्ञातस्थळी घेऊन गेले.
घटनेची माहिती मिळताच पत्नी शीतल ओगले यांनी तत्काळ भूम पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी एका अज्ञात महिलेसह तीन इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४०(३) आणि ३(५) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटना भररस्त्यात आणि भरदुपारी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सध्या या ईको कारचा आणि अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.





