धाराशिव: अतिवृष्टी आणि हवामान बदलाचा मोठा फटका धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीची दखल घेत, कोकणातील हापूस आंबा उत्पादकांच्या धर्तीवर धाराशिवच्या केशर आंबा उत्पादकांनाही तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हवामान बदलाचा बागांना मोठा फटका
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून, सध्या सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याच्या बागा आहेत. येथील विशिष्ट हवामान आणि भौगोलिक स्थितीमुळे या आंब्याला अनोखी चव व गोडवा आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी आपला आंबा निर्यातही करतात. मात्र, यंदा मोहर गळती, अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानातील चढ-उतार आणि फळमाशीचा प्रादुर्भाव यामुळे आंबा उत्पादनात तब्बल ८० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासनाकडून दुजाभाव?
याच नैसर्गिक संकटांमुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य सरकारने त्याची तत्काळ दखल घेत कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २२,५०० रुपयांची मदत जाहीर करून ती वितरितही केली. मात्र, तशीच परिस्थिती आणि नुकसान असूनही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप कोणतीही मदत जाहीर केलेली नाही, याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
कृषी विभागाचा अहवाल प्रलंबित
काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील आणि कृषी विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील चार तालुक्यांतील आंबा बागांची पाहणी केली होती. या पाहणीत उत्पादनात किमान ५० टक्के घट येणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावर आधारित नुकसानीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (धाराशिव) यांनी कृषी आयुक्तालयाकडे पाठवला आहे, मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आमदारांच्या प्रमुख मागण्या:
-
कोकणच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही सरसकट हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी.
-
ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी फळबागेचा पीक विमा काढला आहे, त्यांना सरसकट फळपीक विम्याचा लाभ देण्यात यावा.






