राजकारणात जेव्हा स्वतःच्या नाकर्तेपणाचा बुरखा फाटायची वेळ येते, तेव्हा ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह‘ यांच्यासारखे नेते काय करतात? साधी गोष्ट आहे… ‘पेड दांडकेबहाद्दर’ पत्रकारांचा फौजफाटा घ्यायचा आणि थेट एखाद्या ‘रेडिमेड’ विकासकामावर जाऊन फोटो सेशन करायचं! दोन दिवसांपूर्वी धाराशिव ते तुळजापूर रेल्वे मार्गावर हाच ‘कॅमेरा-शो’ पार पडला आणि जनतेच्या डोळ्यात पुन्हा एकदा धूळफेक करण्याचा प्रयत्न झाला.
शेतकरी वाऱ्यावर, साहेब मात्र ट्रॅकवर!
सध्या धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल झालाय. २०२० चा उर्वरित पीक विमा अजून मिळालेला नाही आणि २०२५ च्या संपूर्ण पीक विम्याचा तर पत्ताच नाही. शेतकरी सरकारच्या नावाने टाहो फोडतायत, बोंबा मारतायत! मग या ज्वलंत प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवायचं कसं? ‘फेसबुक पिंट्या’ यांनी नेहमीप्रमाणे आपली ‘टर्निंग’ची कला वापरली आणि ‘रेल्वे पाहणी’च्या विकासाचं नवं पिल्लू बाजारात सोडून दिलं.
फ्लॅशबॅक: रेल्वेचा खरा इतिहास आणि साहेबांचा ‘पळपुटेपणा’
आता जरा रेल्वेच्या वास्तवाचे ‘रुळ’ तपासून पाहूया.
-
४० वर्षांची मागणी आणि साहेबांचं मौन: धाराशिव-तुळजापूर-सोलापूर हा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी लोक ४० वर्षांपासून घसा फोडत होते. पण ‘फेसबुक पिंट्या’ यांनी या मागणीला कधीच चुकूनही पाठिंबा दिला नाही! हिंमत असेल तर त्यांनी एखादं जुनं पत्र किंवा साधं एखादं ‘बाईट’ तरी दाखवावं!
-
मंजुरी आणि बजेट: हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात २०१४ मध्ये मंजूर झाला, तेव्हा उमरग्याचे ‘हवाई फेम’ रविकिरण (रविचंद्र) खासदार होते. आणि या कामाला खरं बजेट मंजूर होऊन काम सुरू झालं ते २०१९ मध्ये, जेव्हा ‘सूर्यराजे’ खासदार झाले!
‘घड्याळ’ सोडून ‘कमळ’ हाती, तरीही २०२४ ला ‘करेक्ट कार्यक्रम’
‘फेसबुक पिंट्या’ यांचा राजकीय प्रवासही या रेल्वेच्या मार्गासारखाच नागमोडी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत साहेबांचा दणदणीत पराभव झाला. तोपर्यंत ते ‘बारामतीच्या शरदचंद्रां’च्या तालमीत ‘घड्याळ’ लावून फिरणारे मंडलिक होते. पण हवा बदलली तशी साहेबांनी निष्ठा बदलली आणि ‘कमळा’च्या आश्रयाला जाऊन कसाबसा सत्तेत टिकाव धरला.
दुसरीकडे सूर्यराजे मात्र खंबीरपणे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिले. सत्तेतून विरोधी पक्षात जावे लागले, तरी त्यांनी मैदान सोडले नाही. याचाच परिणाम म्हणून २०२४ च्या लोकसभेत जनतेने ‘फेसबुक पिंट्या’ यांच्या पत्नीला पाडून सूर्यराजेंना पुन्हा एकदा दणदणीत बहुमताने खासदार करून साहेबांना त्यांची जागा दाखवून दिली!
भकासपणाला मर्यादा असते, पण काही लोक तीही ओलांडतात!
सर्वांत मोठा विनोद असा की, रेल्वे हा पूर्णपणे ‘केंद्र सरकारचा’ प्रकल्प आहे. खासदार सूर्यराजेंनी लोकसभेत वारंवार आवाज उठवून, सातत्याने पाठपुरावा करून हे काम मंजूर करून आणलं. आणि आमचे ‘फेसबुक पिंट्या’? ते राज्याच्या सरकारमध्ये साधे एक आमदार आहेत (मंत्रीपद तर दूरच!). तरीही, जणू काही मीच स्वतःच्या खिशातून पैसे टाकून हा रेल्वे मार्ग आणलाय आणि मीच इंजिन चालवणार आहे, असा आव आणत ते रेल्वे ट्रॅकची पाहणी करत फिरत आहेत.
अरे साहेब, जनतेला आता सगळं कळतं! कोण संसदेत जाऊन खऱ्या अर्थाने काम करतं आणि कोण फक्त तयार झालेल्या ट्रॅकवर जाऊन ‘फोटो’ काढतं, हे धाराशिवच्या जनतेने चांगलंच ओळखलंय.
“काम दुसऱ्याचं… आणि श्रेय स्वतःचं”
हा ‘क्रेडिट लाटायचा’ प्रकार आता खूप जुना झालाय. त्यामुळे फेसबुकवर खोटा आव आणून जनतेसमोर नाटकं करण्यापेक्षा, स्वतःच्या हिमतीवर केलेलं एखादं काम दाखवा. नाहीतर ही तुमची ‘दिखाऊ पाहणी’, पुढच्या विधानसभा निवडणुकीत जनताच ‘करेक्ट कार्यक्रम’ करून निकालात काढेल!
– बोरूबहाद्दर






