शिराढोण : कळंब तालुक्यातील बोरगाव बु. येथे रस्त्यावर मुरुम टाकू नका, येण्या-जाण्यासाठी रस्ता राहू द्या, असे सांगितल्याच्या रागातून गैरकायद्याची मंडळी जमवून तिघांना चाकूने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि. ४ मे) शिराढोण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू संभाजी भोजणे, किरण बापू भोजणे, सूरज बापू भोजणे, मनोज प्रभू भोजणे, पांडुरंग प्रभू भोजणे आणि रघुनाथ संभाजी भोजणे (सर्व रा. बोरगाव बु., ता. कळंब, जि. धाराशिव) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २५ एप्रिल २०२६) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बोरगाव बु. येथे ही घटना घडली. फिर्यादी हनुमंत रामा माळी (वय ६२), त्यांचे भाऊ मच्छिंद्र माळी आणि पुतण्या अजय माळी हे घटनास्थळी होते. आरोपी तेथे मुरुम टाकत असताना, ‘मुरुम टाकू नका, येण्या-जाण्यासाठी रस्ता राहू द्या,’ असे हनुमंत माळी यांनी आरोपींना सांगितले.
याच कारणावरून आरोपींना राग आला आणि त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये माळी कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर फिर्यादी हनुमंत माळी यांनी सोमवारी (दि. ४ मे) शिराढोण पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून सर्व सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(४), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.






