कळंब : तालुक्यातील सापनाई गावात एकाच रात्रीत तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्याची धक्कादायक घटना आज (१३ मे) उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका जवानाच्या घरासह एका शेतकऱ्याला आणि एका वृद्ध महिलेला लक्ष्य केले आहे. या सलग चोऱ्यांमुळे सापनाई गावात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्या.
-
वृद्ध महिलेला लुटले: एका घटनेत चोरट्यांनी अहिल्याबाई किसन सुरवसे या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. या प्रकारामुळे गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
-
शेतकऱ्याचा पेरणीचा पैसा लंपास: दुसऱ्या घटनेत दिनेश काशिनाथ राऊत या शेतकऱ्याच्या घरात चोरी झाली. राऊत यांनी आपली जुनी बैलजोडी विकून नवीन बैलजोडी घेण्यासाठी घरात काही रक्कम जपून ठेवली होती. चोरट्यांनी तीच रक्कम लंपास केली. सध्या खरिपाचा आणि पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच कष्टाने साठवलेले पैसे चोरीला गेल्याने हे शेतकरी कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
-
जवानाच्या घरावर डल्ला: तिसरी घटना अत्यंत संतापजनक आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या एका जवानाच्या कुटुंबालाही चोरट्यांनी सोडले नाही. जवानाचे वडील मुकुंद माणिक पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. जे देशाचे रक्षण करतात, त्यांच्याच कुटुंबाला गावात सुरक्षितता मिळत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी
या घटनांची माहिती मिळताच गावात मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
सापनाई गावात या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावात रात्रीची गस्त वाढवावी, तसेच या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि गावातील सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.





