धाराशिव जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. वाढत्या तापमानाने नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. अशा भीषण परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना काढण्याऐवजी, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एक प्रचंड विसंगत आणि संतापजनक चित्र पाहायला मिळाले.
एकीकडे धाराशिवकर एका घागरभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे ‘तारणहार’ मात्र जिल्हा परिषदेच्या भर सभेत ‘स्पेशल गुलाबजाम’ आणि ‘ग्रीन सॅलड’वर ताव मारत आहेत! धाराशिव झेडपीचा हा अजब कारभार सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमका प्रकार काय?
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील गंभीर प्रश्नांवर—जसे की जलजीवन मिशनच्या अर्धवट योजना, पाणीटंचाईचे संकट, नादुरुस्त शाळा आणि झेडपीच्या जागेवरील अतिक्रमणे—चर्चा सुरू होती. मात्र, चर्चा करता करता सभेची वेळ संपत आली. आता प्रश्न जनतेचे असले तरी ‘पोटपूजा’ तर वेळेवर व्हायला हवी! त्यामुळे चक्क वेळ वाचवण्याचा ‘अजब’ मार्ग काढण्यात आला.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी आणि नवनिर्वाचित सदस्यांनी थेट भर सभेतच जेवणाची पंगत मांडली. जेवता-जेवता आणि गुलाबजामचा आस्वाद घेता-घेता जनतेच्या दुष्काळी प्रश्नांवर ‘गंभीर’ चर्चा पार पडली!
सभेतील विरोधाभास: ताटात काय आणि नशिबात काय?
-
नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मेन्यू: धाराशिवचे अस्सल ‘स्पेशल गुलाबजाम’, आरोग्यदायी ‘ग्रीन सॅलड’ आणि राईस.
-
जनतेचे वास्तव: रखरखते ऊन, तापलेले रस्ते आणि एका घागरीसाठी सुरू असलेली मैलांची पायपीट.
जिल्ह्यात संतापाची आणि चर्चेची लाट
ज्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील जनतेने आपले हाल थांबवण्यासाठी खुर्चीवर बसवले, त्यांच्या या ‘शाही जेवणावळी’वरून आता जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“आमचा घसा पाण्यावाचून कोरडा पडलाय आणि साहेबांच्या घशात मात्र गुलाबजाम कसे खाली उतरतात?” असा बोचरा सवाल आता धाराशिवची जनता विचारू लागली आहे. एकीकडे सर्वसामान्यांची पाण्यासाठीची ‘वणवण’ आणि दुसरीकडे वातानुकूलित सभागृहात रंगलेली ही ‘भोजन पे चर्चा’, यामुळे प्रशासकीय अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या असंवेदनशीलतेची संपूर्ण जिल्ह्यात खमंग चर्चा रंगली आहे.





