धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा बहुप्रतीक्षित निकाल आता पुढे ढकलण्यात आला आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा निकाल १४ मे रोजी जाहीर होणार होता, मात्र आता न्यायालयाकडून १६ जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निकालाची धाकधूक आता आणखी एक महिना वाढली असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष १६ जूनकडे लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कालबद्ध (Time Bound) पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या या खटल्याची सुनावणी मुंबईचे अतिरिक्त सत्र व विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे.
मागील सुनावणीत न्यायालयाने घेतला होता कडक पवित्रा
यापूर्वी २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गैरहजर राहणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई केली होती. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह बहुतांश आरोपी न्यायालयात हजर होते, मात्र आरोपी क्रमांक ७ कैलास यादव आणि आरोपी क्रमांक ८ शशिकांत कुलकर्णी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. खटला अंतिम टप्प्यात असल्याने सर्व आरोपींची उपस्थिती अनिवार्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच, मुख्य शूटर पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी याला १४ जून रोजी निकालाच्या दिवशी बिहारच्या सिवान कारागृहातून प्रत्यक्ष हजर (Produce Physically) करण्याचे आदेश कारागृह अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
१६ महिन्यांचा कट आणि परदेशी शस्त्रांचा वापर
पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १६ महिने कट रचला गेल्याचे तपासात उघड झाले होते. फेब्रुवारी २००५ मध्ये लातूर येथे पहिली रेकी करण्यात आली होती. अखेर ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे ही निर्घृण हत्या करण्यात आली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून चालक समद काझी यांच्यावरही गोळी झाडण्यात आली. या हत्येत ‘मेड इन युएसए’ आणि ‘चायना’ बनावटीची परदेशी शस्त्रे वापरण्यात आली होती.
२५ लाखांची सुपारी आणि ३ तपास यंत्रणा
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर सीआयडी (CID) आणि शेवटी सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला होता. या प्रदीर्घ खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तब्बल १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली गेली.
या प्रकरणातील ९ आरोपी:
१. डॉ. पद्मसिंह पाटील (माजी मंत्री)
२. पारसमल जैन बादला
३. दिनेश तिवारी (शूटर)
४. मोहन शुक्ला (नगरसेवक, मुंबई)
५. सतीश मंदाडे (लातूर)
६. पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी (शूटर)
७. कैलास यादव (बसपा नेता, युपी)
८. शशिकांत कुलकर्णी (माजी उत्पादन शुल्क निरीक्षक)
९. छोटे पांडे
सीबीआयने मांडलेले भक्कम पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि तब्बल २० वर्षांची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई पाहता, आता १६ जून रोजी न्यायालयातून कोणता ऐतिहासिक निकाल समोर येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.







