धाराशिव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बंद घरे, शेतातील कृषी पंप आणि साहित्यासह दुचाकीला चोरट्यांनी लक्ष्य केले असून, तब्बल पाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी १३ मे रोजी येरमाळा, शिराढोण, परंडा आणि उमरगा पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवशी चोरीचे अर्धा डझन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बंद घरांना लक्ष्य; लाखोंचा ऐवज पळवला
कळंब तालुक्यातील सापनाई येथील दिनेश काशीनाथ राऊत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १२ आणि १३ मे च्या रात्री ८० हजार रुपये रोख आणि १२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी येरमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांजणी (ता. कळंब) येथील श्रीकृष्ण भारत गोरे यांच्या घरातून २ ते ३ मे दरम्यान १ लाख २० हजार रुपये किमतीचे ४ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने लांबवले. तसेच परंडा शहरात सिकलकर गल्लीतही असाच प्रकार घडला असून, राज महादेव काटवटे यांच्या घरातून ११ ते १२ मे च्या दरम्यान १ लाख रुपये रोख आणि ५ ग्रॅम सोने असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेतकरीही रडकुंडीला; शेती साहित्याची चोरी
घरांपाठोपाठ चोरट्यांनी शेतातही डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. परंडा तालुक्यातील सिरसाव येथील पांडुरंग जनार्धन चोबे आणि रुपेश चोबे यांच्या शेतातून ९ मे रोजी सकाळी शक्ती कंपनीचे सोलार, मोटार आणि ६५० फूट केबल असा ४१,२५० रुपयांचा माल चोरीला गेला.
दुसरीकडे, कळंब तालुक्यातील अवधूतवाडी येथील प्रभुलिंग शिवलिंग अवधूत यांच्या शेतातून ७ ते ८ मे दरम्यान ३ एचपीची पाणबुडी मोटार, १७० फूट नायलॉन रस्सी आणि २० फूट केबल असा २१,२०० रुपयांचा माल लंपास करण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये अनुक्रमे परंडा आणि येरमाळा पोलिसांत गुन्हे नोंद आहेत.
कवठा नदीजवळून दुचाकी पळवली
उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील मुंधेवाडीचे रहिवासी येडू दगडू भुई यांची ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न दुचाकी (एमएच १३ ईआर ८७६६) ९ मे रोजी दुपारच्या सुमारास कवठा नदीजवळील मारुती मंदिराजवळून अज्ञात चोरट्याने पळवून नेली. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या चोऱ्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता स्थानिक पोलिसांसमोर उभे राहिले आहे.







