धाराशिव : जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिर परिसर आणि कळंब येथील बसस्थानकावर भाविक व प्रवासी महिलांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील दागिने व मणिमंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांत तब्बल पाच महिलांचे एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या वाढत्या चोऱ्यांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, येरमाळा आणि कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येडेश्वरी मंदिर परिसरात तीन महिलांना लुटले
येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिर परिसरातील कल्लोळ जवळ दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांना चोरट्यांनी लक्ष केले. १५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नागुलगाव (ता. कळंब) येथील मीरा सोपान भोरे (वय ४८) आणि त्यांच्या जाऊबाई यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे साडेपाच ग्रॅमचे मणिमंगळसूत्र अज्ञाताने चोरले.
याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता गावसूद येथील प्रीती महादेव सगर (वय २८) यांचे १५ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, तर सकाळी ११ वाजता काशिदवाडी (ता. केज, जि. बीड) येथील अश्विनी सखाराम कदम (वय ३५) यांचे ३५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत लांबवण्यात आले. या तिन्ही घटनांप्रकरणी फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंब बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने पळवले
दुसरीकडे, कळंब बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलांचे दागिने पळवण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता थेरगाव (पुणे) येथील मनीषा मधुकर विभुते (वय ४६) या कळंब-परळी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे दागिने चोरट्याने पळवले.
तसेच, १४ मे रोजी दुपारी १.१० वाजता माणगाव (जि. रायगड) येथील मंगल अर्जुन सोनवणे (वय ६०) या बसमध्ये चढत असताना त्यांच्याही गळ्यातील १५ ग्रॅमचे ३५ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञाताने चोरी केले.
या पाचही घटनांप्रकरणी संबंधित येरमाळा आणि कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बसस्थानक आणि मंदिर परिसरातील वाढत्या चोऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.




