धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाशी, ढोकी, कळंब आणि परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दोन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी, बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने चोरी, तर एका ठिकाणाहून चक्क शेळ्या-बोकड पळवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी १६ मे रोजी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात एकूण ६ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
इंदापूर (ता. वाशी) येथे सव्वादोन लाखांची घरफोडी
वाशी तालुक्यातील इंदापूर येथे सतीश कल्याण पारडे (वय ३७) यांच्या बंद घराचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. १५ मे रोजी रात्री १० ते १६ मे च्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि ५३,७०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख २१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सतीश पारडे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ढोकीत पावणेतीन लाखांचा ऐवज पळवला
ढोकी येथील बालाजी नगर भागात राहणारे खंडेश्वर बाबासाहेब घोडके (वय ४४) यांच्याही बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. १३ मे रोजी सकाळी १० ते १५ मे च्या रात्री ११ वाजेच्या दरम्यान घोडके यांचे घर बंद असताना चोरट्यांनी कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. या ठिकाणाहून सोन्या-चांदीचे दागिने आणि १५,००० रुपये रोख असा एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी घोडके यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३०५(ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब बसस्थानकात महिलेचे दागिने लांबवले
मुंबईतील कुर्ला पूर्व (इंदिरा नगर झोपडपट्टी) येथे राहणारे इस्माईल याकुब कुरेशी (वय ५६) आणि त्यांच्या पत्नी अकीला कुरेशी हे १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कळंब बसस्थानकात आले होते. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अकीला कुरेशी यांच्या पर्समधील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ७०,००० रुपये) हातोहात लांबवले. याप्रकरणी १६ मे रोजी इस्माईल कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेखापुरातून शेळ्या-बोकडांची चोरी
भूम तालुक्यातील शेखापूर येथे घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या आणि दोन बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १० मे रोजी दुपारी १२.३० ते पहाटे ६ च्या दरम्यान ही घटना घडली. या चोरीत अंदाजे ४०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अनिल बापू हांडे (वय ३३, रा. शेखापूर) यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणांचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.





