धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निकालाबाबत पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’ पाहायला मिळाली आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज (१६ जून) या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार होता, मात्र न्यायालयाकडून ही तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या खटल्याचा अंतिम फैसला २० जून रोजी होणार आहे. न्यायालयाने केवळ चार दिवसांनी ही तारीख वाढवली असली, तरी यामुळे दोन्ही कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता आणि धाकधूक आणखी वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईच्या विशेष न्यायालयात हा खटला कालबद्ध (Time Bound) पद्धतीने चालवला जात आहे. यापूर्वी हा निकाल १४ मे रोजी येणार होता, त्यानंतर तो १६ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि आज पुन्हा यात बदल होऊन आता २० जून ही नवी तारीख निश्चित करण्यात आली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांची भावूक पोस्ट; २० वर्षांच्या संघर्षावर भाष्य
निकालाच्या या पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर एक अत्यंत भावूक आणि तितकीच आक्रमक पोस्ट शेअर केली आहे.
“२० वर्षे १३ दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची,” असे म्हणत ओमराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पुढे लिहिले की,
“हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा संघर्ष आहे..! आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी, एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे.”
मुख्य शूटरला प्रत्यक्ष हजर करण्याचे होते आदेश
या खटल्याच्या अंतिम टप्प्यात न्यायालयाने अत्यंत कडक पवित्रा घेतला होता. मुख्य शूटर पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी याला बिहारच्या सिवान कारागृहातून न्यायालयात प्रत्यक्ष हजर (Produce Physically) करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच गैरहजर आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्यात आले होते. मात्र, आज ऐनवेळी निकालाची तारीख ४ दिवसांनी पुढे गेल्याने आता सर्वांच्या नजरा २० जूनकडे लागल्या आहेत.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने तब्बल २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली गेली होती. या प्रदीर्घ खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींवर आता २० जून रोजी काय ऐतिहासिक निकाल येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







