लोहारा: “आमची बहीण कुठे आहे, तिचा पत्ता सांग,” असे म्हणत बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने अन्य ५ अनोळखी साथीदारांसह लोहारा येथील एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याचे भररस्त्यातून बळजबरीने गाडीत घालून अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदुपारी सास्तूर येथे घडले नाट्य
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश विनायक बारकुल (वय ३७ वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा, जि. धाराशिव) हे बुधवारी (१७ जून २०२६) दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास सास्तूर येथील काकासाहेब गायकवाड यांच्या घरासमोरून जात होते. त्याचवेळी बीड जिल्ह्यातील परळी येथून आलेल्या काही जणांनी त्यांना रस्त्यात गाठले.
गैरकायद्याची मंडळी जमवून जीवघेणा हल्ला
आरोपी गफार रजाक शेख, रौफ rजाक शेख, रहीम रजाक शेख, रहीमुन बागवान शेख (सर्व रा. परळी, ता. परळी, जि. बीड) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर ५ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर टोळी जमवून योगेश बारकुल यांना घेरले. “आमची बहीण कुठे आहे, तिचा पत्ता सांग,” अशी विचारणा करत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.
योगेश यांनी नकार देताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता या टोळीने योगेश यांना बळजबरीने स्वतःच्या गाडीत कोंबले आणि त्यांचे अपहरण करून पळवून नेले. या मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल
अपहरणाच्या या थरारक प्रकारानंतर जखमी योगेश बारकुल यांनी १७ जून रोजीच लोहारा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी परळीच्या शेख कुटुंबातील ४ नामजद आणि ५ अज्ञात अशा एकूण ९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(४) (अपहरण), ११८(१), १८९(१), १८९(२), १९०, ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बीडच्या या कुटुंबाने लोहारामध्ये येऊन तरुणाचे अपहरण केल्यामुळे परिसरात सध्या मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.







