धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर आज (१६ जून) जाहीर होणार आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज मुंबईतील विशेष न्यायालय यावर आपला अंतिम फैसला सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर एक अत्यंत भावूक आणि तितकीच आक्रमक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“हा संघर्ष मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीविरुद्ध आहे,” अशा घणाघाती शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्यांचा आज फैसला”
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“२० वर्षे १३ दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची. माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे २० वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अशांचा आज फैसला होणार ही अपेक्षा.”
पैशाची मस्ती विरुद्ध आमचा संघर्ष!
पुढे बोलताना ओमराजेंनी या खटल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय मानसिकतेवर प्रहार केला. त्यांनी लिहिले, “हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे..! आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लावून न्यायाची अपेक्षा करत आहेत.”
खुन्यांना कठोर शिक्षा व्हावी; आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
न्यायालयीन प्रक्रियेला झालेल्या विलंबावर बोट ठेवत त्यांनी दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. “न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे,” अशा शब्दांत ओमराजेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
खटल्याची पार्श्वभूमी आणि आजचा दिवस:
३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कालबद्ध (Time Bound) पद्धतीने मुंबईच्या विशेष न्यायालयात हा खटला चालवला गेला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली गेली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला असून, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींवर आज न्यायालय काय अंतिम निकाल देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





