धाराशिव : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असतानाच, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. व्यंकट गुंड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषदेच्या धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने भाजपमधील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.
रविवार (२ ऑगस्ट) रोजी धाराशिव येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड, तसेच भाजपमधील अनेक निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांची नावे आहेत. मात्र, धाराशिवचे भाजप आमदार राणा पाटील यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे नेते तथा खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते आमदार राणा पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यांच्यासह भाजपमधील निष्ठावंत गटातील नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व वाढले आहे.
दरम्यान, सत्कारमूर्ती आमदार बसवराज पाटील हेही आमदार राणा पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जातात. उमरगा तालुक्यातील मुरूम येथील रहिवासी असलेल्या बसवराज पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राणा पाटील आणि ॲड. अनिल काळे यांच्यातील वाद उघडपणे समोर आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनीही उघडपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. अशा पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्यक्रम केवळ विजयाचा सत्कार आहे की भाजपमधील निष्ठावंत गटाचे शक्तीप्रदर्शन, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निमंत्रण पत्रिकेतील राजकीय समीकरणे आणि राणा पाटील यांची अनुपस्थिती यामुळे आता एकच चर्चा रंगली आहे—हा बसवराज पाटील यांचा सत्कार सोहळा आहे की भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा?





