धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या आणि राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर आज (१६ जून) लागणार आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर आज मुंबईतील विशेष न्यायालय यावर आपला अंतिम ऐतिहासिक निकाल सुनावणार असल्याने, धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राची धाकधूक शिगेला पोहोचली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कालबद्ध (Time Bound) पद्धतीने चालवल्या गेलेल्या या खटल्याची सुनावणी मुंबईचे अतिरिक्त सत्र व विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात पूर्ण झाली असून आज यावर निकाल वाचन होणार आहे. यापूर्वी हा निकाल १४ मे रोजी लागणार होता, परंतु न्यायालयाने आजची (१६ जून) तारीख निश्चित केली होती.
मुख्य शूटरला प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश
या खटल्याच्या अंतिम टप्प्यात न्यायालयाने अत्यंत कडक पवित्रा घेतला होता. मागील सुनावणीदरम्यान गैरहजर राहिलेले आरोपी कैलास यादव आणि शशिकांत कुलकर्णी यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. तसेच, मुख्य शूटर पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी याला आज निकालाच्या दिवशी बिहारच्या सिवान कारागृहातून न्यायालयात प्रत्यक्ष हजर (Produce Physically) करण्याचे आदेश कारागृह अधीक्षकांना देण्यात आले आहेत. आज सर्व आरोपींच्या उपस्थितीत हा निकाल दिला जाणार आहे.
१६ महिन्यांचा कट आणि परदेशी शस्त्रांचा वापर
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १६ महिने कट रचला गेला होता. फेब्रुवारी २००५ मध्ये लातूर येथे पहिली रेकी करण्यात आली होती. त्यानंतर ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे निंबाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांचे चालक समद काझी यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हत्याकांडात ‘मेड इन युएसए’ आणि ‘चायना’ बनावटीची अत्याधुनिक परदेशी शस्त्रे वापरण्यात आली होती.
२५ लाखांची सुपारी आणि १२८ साक्षीदार
या हायप्रोफाइल प्रकरणाचे गांभीर्य पाहून याचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर सीआयडी (CID) आणि शेवटी सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला होता. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली गेली होती. या प्रदीर्घ खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तब्बल १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.
या खटल्यातील ९ प्रमुख आरोपी:
१. डॉ. पद्मसिंह पाटील (माजी मंत्री)
२. पारसमल जैन बादला
३. दिनेश तिवारी (शूटर)
४. मोहन शुक्ला (नगरसेवक, मुंबई)
५. सतीश मंदाडे (लातूर)
६. पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी (शूटर)
७. कैलास यादव (बसपा नेता, युपी)
८. शशिकांत कुलकर्णी (माजी उत्पादन शुल्क निरीक्षक)
९. छोटे पांडे
सीबीआयने न्यायालयात मांडलेले भक्कम तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि २० वर्षांचा प्रदीर्घ काळ पाहता, आज न्यायालयातून कोणता ऐतिहासिक न्याय मिळतो आणि कोणाला शिक्षा होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे आणि जनतेचे डोळे लागले आहेत.






