महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तीर्थक्षेत्राला आज गुन्हेगारी, चोऱ्या आणि दरोड्यांनी ग्रासले आहे. दररोज लाखो भाविक मोठ्या आशेने, श्रद्धेने आई भवानीच्या दर्शनासाठी येथे येतात. पण दुर्दैवाने, आज त्याच भाविकांना लुटण्याचे उघड कारनामे राजरोसपणे सुरू आहेत. सर्वात संतापजनक आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ते तुळजापूरचे पोलीस प्रशासन मात्र कुंभकर्णी गाढ झोपेत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या या नाकर्तेपणाविरोधात साखळी उपोषणाला बसावे लागते आणि आज या आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडतो, हेच मुळात स्थानिक पोलीस प्रशासनाचे सर्वात मोठे अपयश आहे.
तुळजापूरची सध्याची परिस्थिती पाहता, पोलीस नेमके कोणासाठी काम करत आहेत? असा रोकडा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात स्थानिक पोलीस यंत्रणा पूर्णपणे निकामी ठरली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि पोलीस उपाधीक्षक निलेश देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर आता थेट जनतेनेच बोट ठेवले आहे. या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की, त्यांना आता कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही.
शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया या व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. त्यांनी अत्यंत संतप्त शब्दांत म्हटले की,
“तुळजापुरात आजवर अनेक पोलीस अधिकारी आले आणि गेले, मात्र पोलीस निरीक्षक मांजरे आणि पोलीस उपाधीक्षक निलेश देशमुख यांच्यासारखे निष्क्रिय अधिकारी यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. जर येथे भाविकांची अशीच लूट होत राहणार असेल, तर भाविकांनी तुळजापुरात यायचे की नाही?”
हा केवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा सवाल नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांच्या मनातील तीव्र संताप आहे.
ड्रग्ज प्रकरणातील वसुली आणि संशयास्पद मुदतवाढ!
तुळजापुरात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बुरखा टरकला आहे तो येथील धक्कादायक ‘ड्रग्ज’ प्रकरणामुळे. या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी स्वतःचे हात ओले केल्याची उघड चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. पोलिसांनी मूळ मुख्य आरोपींना तर सोडून दिलेच, पण ज्यांच्यासोबत केवळ १० हजार रुपयांचे बँक ट्रांजेक्शन सापडले त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. याउलट, ज्यांचे मुख्य आरोपींसोबत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त बँक ट्रांजेक्शन असतानाही त्यांना मात्र पोलिसांनी उघडपणे अभय दिले! पैशांच्या या खेळात पोलीस प्रशासन गुन्हेगारांचे भागीदार बनले आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर, पोलीस उपाधीक्षक निलेश देशमुख यांच्या कार्यकाळावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुळात निलेश देशमुख यांना यापूर्वी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पण जनतेचा सवाल आहे की, देशमुख यांनी असे कोणते महान ‘कर्तृत्व’ गाजवले होते की त्यांना ही मुदतवाढ मिळाली? आज त्यांची ती एक वर्षाची मुदतवाढ संपूनही त्यांची तुळजापुरातून उचलबांगडी का करण्यात आलेली नाही? ते अजूनही कोणत्या अधिकाराने त्या पदावर खुर्ची उबवत आहेत?
लाचखोरीचे साम्राज्य आणि कोणाची लाभतेय ‘छत्रछाया’?
भ्रष्टाचाराची पाळेमुळे केवळ उपाधीक्षकांपर्यंत मर्यादित नाहीत, तर ती खाली पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहेत. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या थेट हाताखाली काम करणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) उघडपणे लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले. आपल्या नाकाखाली आपला दुय्यम अधिकारी लाच घेतो, तरीही पोलीस निरीक्षक मांजरे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही की त्यांची बदली केली जात नाही, हा अजब न्याय कोणता?
तुळजापुरात सुरू असलेले हे सर्व अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री आणि भाविकांची लूट नेमकी कोणाच्या ‘छत्रछायेखाली’ सुरू आहे, हे आता जगजाहीर झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांचे हे साटेंलोटं आता लपून राहिलेले नाही.
जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर मूग गिळून गप्प का?
या संपूर्ण अनागोंदी कारभारात सर्वात मोठे आणि रहस्यमय मौन बाळगले आहे ते जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक (SP) रितू खोखर यांनी! संपूर्ण तुळजापूर शहर जळत असताना, भाविक लुटले जात असताना आणि स्वतःच्या खात्यातील अधिकारी लाचखोरी आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये संशयित असताना, एसपी रितू खोखर या मूग गिळून गप्प का बसल्या आहेत? त्यांच्या या संशयास्पद मौनामागे काय राजकारण आहे? की या निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी त्यांच्यावर ‘वरून’ कोणता राजकीय दबाव आहे?
आता ‘उचलबांगडी’ नव्हे, कठोर कारवाई हवी!
जर जिल्ह्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारीच अशा गंभीर प्रकरणांवर डोळे झाकून बसणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? तुळजापूरच्या पवित्र भूमीला गुन्हेगारीचा कलंक लावणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. गृहखात्याने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा जनतेच्या या संतापाचा भडका उडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल!
- सुनील ढेपे , संपादक. धाराशिव लाइव्ह




