धाराशिव | दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुट, परीक्षा प्रक्रियेतील कथित गोंधळ, पारदर्शकतेचा अभाव आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर देशभरातील विद्यार्थी, पालक व युवकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ बुधवारी रात्री धाराशिव शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चद्वारे विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
आयोजकांनी सांगितले की, विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हातात शस्त्रे नव्हती, तर न्यायाची अपेक्षा आणि संविधानावरील विश्वास होता. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीला धरून नसल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी नीट पेपरफुट प्रकरणासह परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
आयोजकांच्या मते, धाराशिवमधील कॅन्डल मार्च हा केवळ निषेध नव्हता, तर संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी दिलेला निर्धाराचा संदेश होता. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी देशातील युवक, पालक आणि जागरूक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दडपशाहीऐवजी संवादातून तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.





