‘आपला जीव धाराशिव’ आणि ‘व्हिजन २०३०’ च्या नावाखाली सध्या धाराशिव जिल्ह्यात भन्नाट ‘आयडियाच्या कल्पना’ राबवण्याचा सीझन सुरू आहे. संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा अजब फतवा काढल्यानंतर, आता हे अमलात आणण्यासाठी चक्क गावात ‘सायरन’ (भोंगा) वाजवण्याचे फर्मान ‘माऊलीं’नी (अध्यक्षा अर्चना पाटील) काढले आहे.
फेसबुकवर ‘सक्सेस’ आणि ‘पेड न्यूज’चा गाजावाजा!
गावात सायरन वाजला रे वाजला, की पोरं लगेच मोबाईल फेकून पुस्तकात डोके खुपसून अभ्यासाला लागतात, असा मोठा शोध माऊली आणि राणा साहेबांनी लावला आहे. तशा आशयाच्या गोड गोड पोस्ट्स या दोघांनीही तातडीने फेसबुकवर टाकून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.
एवढेच नाही, तर काही ‘पेड’ (पैसे देऊन छापलेल्या) बातम्याही काही चॅनेल्सवर झळकवण्यात आल्या. ‘बघा बघा, आमच्या सायरनमुळे धाराशिवचे मियाँ खलिफे थेट शास्त्रज्ञच बनू लागलेत,’ असाच काहीसा आव या बातम्यांमधून आणला गेला. पण साहेबांच्या आणि माऊलींच्या या ‘सायरन’ प्रयोगाचा इतिहास धाराशिवकरांसाठी काही नवीन नाही!
२०२१ चा फ्लॉप शो: जेव्हा साहेबांनी वाजवला होता ‘चोर भोंगा’!
‘आपला जीव धाराशिव’ मध्ये आता जो सायरन वाजणार आहे, त्यापूर्वीच राणा पाटील साहेबांनी २०२१ मध्ये असाच एक भोंगा वाजवला होता.
काय होता तो प्रकार?
२०२१ मध्ये धाराशिव शहरात चोऱ्यांचे प्रमाण भयंकर वाढले होते. रोज घरफोड्या होत होत्या. अशा वेळी एका लोकप्रतिनिधीचे काम काय असते? तर, पोलीस यंत्रणेला जाब विचारणे, त्यांना सक्षम करणे आणि चोरांचा बंदोबस्त करायला लावणे. पण आपले साहेब तिथेही ‘व्हिजनरी’!
त्यांनी थेट पोलिसांची जबाबदारी कमी करून, सुरक्षेचे ओझे सामान्य नागरिकांच्याच बोकांडी मारले. “चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांनीच भोंगे/सायरन बसवावेत आणि एकमेकांना सावध करावे,” अशी ‘आयडियाची कल्पना’ साहेबांनी त्यावेळी मांडली होती. म्हणजे, टॅक्स आम्ही भरायचा, पोलीस यंत्रणा तुम्ही पोसायची आणि रात्री चोरांच्या मागे भोंगे वाजवत आम्हीच पळायचे!
गोड गोड कल्पना, पण प्रत्यक्षात ‘फुसका बार’
साहेबांनी २०२१ मध्ये वाजवलेला तो भोंगा काही चांगला वाजला नाही. चोऱ्या थांबल्या नाहीत, पोलिसांचा वचक वाढला नाही, आणि साहेबांच्या त्या कल्पनेचा पुढे कोणताही पाठपुरावा झाला नाही. हवेत गोड गोड संकल्पना सोडायच्या, इव्हेंट करायचा आणि नंतर मूळ प्रश्नाकडे पाठ फिरवायची, हा इथला जुनाच पॅटर्न आहे.
पब्लिक सब जानती है… हे डिजिटल युग आहे!
नेत्यांना नेहमी असे वाटते की जनतेची स्मरणशक्ती खूप कमकुवत असते, ती लवकरच जुन्या गोष्टी विसरते. पण साहेब, हे तंत्रज्ञानाचे आणि स्मार्टफोनचे युग आहे! इथल्या जनतेकडे तुमच्या अशा प्रत्येक ‘फ्लॉप आयडिया’चे आणि फसव्या घोषणांचे जुने व्हिडिओ आणि बातम्यांचे कटिंग मोबाईलमध्ये सेव्ह आहेत.
२०२१ चा ‘चोर भोंगा’ जसा फ्लॉप झाला, तसाच आताचा हा ‘अभ्यास सायरन’ किती काळ वाजतो आणि या ‘पेड’ बातम्यांच्या पलीकडे जाऊन वास्तवात किती मुले ‘व्हिजन २०३०’ मधून घडतात, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तोपर्यंत, सायरन वाजू दे, फेसबुक लाईव्ह चालू दे!




