धाराशिवमध्ये भाजपचा अंतर्गत वाद मिटता मिटत नसताना, आता शिवसेना शिंदे गटात नव्या कार्यकारिणीचा ‘फॉर्म्युला’ तयार होत आहे. पण हा फॉर्म्युला म्हणजे राजकीय समीकरणांपेक्षा तिन्ही बड्या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी लावलेला एक भन्नाट ‘जुगाड’ ठरताना दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच पक्षाचे तब्बल तीन जिल्हाप्रमुख नेमण्याची नवी क्लृप्ती आता लढवली जात आहे!
‘एका म्यानात दोन तलवारी मावत नाहीत’ ही म्हण जुनी झाली; धाराशिव शिंदे सेनेत आता एकाच म्यानात तीन तलवारी कोंबण्याची तयारी सुरू झाली आहे. कोणाला कोणता भाग मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार? पाहूया हे नवीन त्रिस्तरीय गणित!
१. ओमराजेंचा बालेकिल्ला: धाराशिव-कळंब-तुळजापूर (सोमनाथ गुरवांची वर्णी?)
नुकतेच ठाकरे गट सोडून सत्तेत दाखल झालेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे धाराशिव, कळंब आणि तुळजापूर या तीन महत्त्वाच्या तालुक्यांची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. ओमराजेंच्या एन्ट्रीमुळे आता या पट्ट्यात त्यांचाच शब्द अंतिम मानला जाईल.
- नवा चेहरा: या तिन्ही तालुक्यांसाठी ओमराजेंचे विश्वासू, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
- माजी अध्यक्षांचे काय?: या नियुक्तीमुळे जुन्या समीकरणांची मात्र पार दैना उडणार आहे. पूर्वी अध्यक्ष असलेले सूरज महाराज साळुंके आणि नंतर थेट भाजप आमदार राणा पाटलांचे समर्थक असल्याचा आरोप झालेले अजित पिंगळे—या दोघांचे पुनर्वसन कसे होणार? पिंगळेंच्या नियुक्तीवरून आधीच सोलापुरात श्रीकांत शिंदेंच्या बैठकीत राडा झाला होता. त्यामुळे आता गुरव यांच्या नावाची घोषणा झाल्यास पिंगळे आणि सूरज महाराज यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होणार का, हा मोठा प्रश्न आहे.
२. सावंत साहेबांची ‘सत्ता’: भूम-परंडा-वाशी
माजी मंत्री आणि भूम-परंड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांचा दबदबा असलेले भूम, परंडा आणि वाशी हे तीन तालुके सावंत यांच्याच मर्जीनुसार चालणार आहेत.
- या भागात पूर्वी सावंत समर्थक दत्ताआण्णा साळुंके हे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते.
- आता नव्या रचनेत सावंत साहेब दत्ताआण्णांनाच कायम ठेवणार की त्यांच्या जागी नवा चेहरा आणणार, याचा फैसला पूर्णपणे तानाजी सावंत यांच्याच हातात असणार आहे.
३. गायकवाड-चौगुल्यांचा गड: उमरगा-लोहारा
माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा प्रभाव असलेल्या उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यांसाठी वेगळा जिल्हाप्रमुख असणार आहे.
- या भागात पूर्वी रवींद्र गायकवाड यांचे समर्थक मोहन पनुरे यांच्याकडे जबाबदारी होती.
- आता पुन्हा पनुरे यांच्याच गळ्यात माळ पडणार की गायकवाड-चौगुले जोडी एखादा नवीन मोहरा पुढे करणार, यावर या पट्ट्यातील राजकारण ठरणार आहे.
ठाण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचाही ‘हात’!
या तीन स्थानिक नेत्यांच्या गणितात आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक! सरनाईक हे मूळचे ठाण्याचे असले, तरी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीत आणि काही महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये त्यांचाही ‘शब्द’ ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या यादीत सरनाईक साहेब आपले कोणकोणते शिलेदार घुसवतात, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.
जुगाड यशस्वी होणार की नवा भडका उडणार?
थोडक्यात काय, तर ओमराजे, तानाजी सावंत आणि रवींद्र गायकवाड या तिन्ही नेत्यांची मर्जी राखण्यासाठी जिल्ह्याचे तीन तुकडे करून तीन स्वतंत्र ‘सुभेदार’ नेमण्याचा हा प्लॅन आहे. पण यामुळे अंतर्गत हेवेदावे संपणार की “माझ्या तालुक्यात तुझा हस्तक्षेप नको,” म्हणून शिंदे गटात भाजपपेक्षाही मोठा राडा पाहायला मिळणार? याकडेच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!




