धाराशिव: येडशी येथे २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. माहेरहून गाडी घेण्यासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेऊन ये, या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती धिरज पवार (वय २६, रा. येडशी, ता. जि. धाराशिव) यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी आशा बाळासाहेब कदम (वय ४०, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी १४ ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, धिरज श्यामसुंदर पवार, आशा श्यामसुंदर पवार आणि श्यामसुंदर उर्फ पोपट पवार (सर्व रा. येडशी) हे आरतीला माहेरहून गाडी घेण्यासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेऊन ये, अशी मागणी करत होते.
या मागणीवरून आरोपींनी आरतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच वारंवार जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आरतीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५, ३५१(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करीत आहेत.



