धाराशिव : आंबेवाडी शिवारातील वन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वन अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर जमावाने दगडफेक करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात ५ नामजद आरोपींसह इतर २१ जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी शिवारातील वन जमिनीच्या गट क्रमांक ३०९ मध्ये काही जणांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले होते. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वन विभागाचे पथक हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करत होते.
त्यावेळी सांजा येथील शिवाजी शंकर पवार, युवराज मुरली पवार, आत्माराम काळे, अरुण आत्माराम काळे, दत्ता आत्माराम काळे आणि इतर २१ जणांनी बेकायदेशीर मंडळी जमवून कारवाईला विरोध केला. आरोपींनी वन परिमंडळ अधिकारी बालाजी मुदाळे व पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत “तुमची नोकरी घालवतो” अशी धमकी दिली. तसेच स्वतःला दगडाने मारहाण करून घेत पोलिसांवर व अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत शासकीय वाहनावर दगड मारून वाहनाचे मोठे नुकसान करण्यात आले व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला.
२६ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी वन परिमंडळ अधिकारी बालाजी पंढरीनाथ मुदाळे (वय ४२, रा. वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२७(७), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२)(३), आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेंबळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




