धाराशिव : धाराशिव नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या सात नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजप प्रवेशाचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता हे पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या राजकीय घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.
“भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जो घोडेबाजार सुरू आहे, त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या घोडेबाजाराशी ठाकरे गटाचा काहीही संबंध नाही. सध्या सुरू असलेली नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.”
पक्षातील नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर जाधवर यांनी आगामी काळातील पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.
“जे ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ आहेत, त्यांना सोबत घेऊन आम्ही संघर्ष करू. जे पक्षासोबत राहतील त्यांना घेऊन संघटना अधिक बळकट केली जाईल.”
दरम्यान, पाच नगरसेवकांच्या संभाव्य शिंदे गट प्रवेशामुळे धाराशिव नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जाधवर यांनी केलेला ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’ हा आरोप आता स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.





