धाराशिव – सार्वजनिक शांतता राखण्यासाठी दिलेल्या अंतिम बंधपत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी धाराशिव येथील एका सराईताविरुद्ध विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. बंधपत्राच्या अटींचा भंग केल्यामुळे आरोपीविरुद्ध रिमांड वॉरंट जारी करून त्याची उर्वरित कालावधीसाठी धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
नेमकी कारवाई काय?
अमृतनगर (धाराशिव) येथील रहिवासी शांताराम नंदू लोंढे (वय ३० वर्षे) याच्यावर यापूर्वी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते.
मात्र, संबंधित आरोपीने या बंधपत्रातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून शांततेचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात आनंदनगर पोलीस ठाण्याकडून BNSS कलम १४१ अन्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला होता.
जिल्हा कारागृहात रवानगी
आनंदनगर पोलिसांच्या अहवालाची दखल घेत विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी शांताराम लोंढे याच्याविरुद्ध BNSS कलम १४१(१)(बी) प्रमाणे रिमांड वॉरंट जारी केले. या आदेशानुसार आरोपीची बंधपत्राच्या उर्वरित कालावधीसाठी थेट धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आणि बंधपत्राचा भंग करणाऱ्या समाजकंटकांवर अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.




