धाराशिव: भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला गती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी आज (दि. ५ सप्टेंबर) नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक संधी देण्यात आली असून, यामुळे भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम आणि मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
नव्याने करण्यात आलेल्या संघटनात्मक नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत:
-
सरचिटणीस: माधव बळीराम पवार (उमरगा ग्रामीण – कोराळ), शिवाजी अन्याबा गिड्डे पाटील (कळंब ग्रामीण – डिकसळ)
-
उपाध्यक्ष: दिलीपसिंह करणसिंह गौतम (उमरगा ग्रामीण – माडज), गौतम रामा लटके (परंडा ग्रामीण – राजुरी), दत्तात्रय काशिनाथ मोहिते (भूम ग्रामीण – वालवड)
-
सचिव (चिटणीस): राहुल हरिभाऊ काकडे (धाराशिव शहर), ज्ञानेश्वर सोपान गीते (भूम ग्रामीण – आंडुड), संग्राम गुणवंतराव देशमुख (धाराशिव ग्रामीण – ढोकी), विठ्ठल रामभाऊ माने (कळंब ग्रामीण – गंभीरवाडी), प्रमोद रामदास पोतदार (लोहारा शहर)
-
सोशल मीडिया जिल्हा समन्वयक: अविनाश ज्योतीराम भोसले (धाराशिव ग्रामीण – पळसप)
राहुल काकडेंच्या नियुक्तीवर कुलकर्णींचे स्पष्टीकरण
काही दिवसापूर्वी राहुल काकडे यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. आता या नव्या यादीत त्यांची पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत सचिव (चिटणीस) म्हणून वर्णी लागली आहे. यावर बोलताना दत्ता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पद संपते, त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याला मुख्य कार्यकारिणीत (फादर बॉडीवर) चिटणीस म्हणून सामावून घेण्याची पद्धत आहे. त्यानुसारच त्यांना घेण्यात आले आहे.”
सहा महिन्यांत पद गेले अन् ‘रडक्याचे डोळे पुसले’
भाजपच्या या नियुक्त्यांनंतर राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच खुमासदार चर्चा रंगली आहे. राहुल काकडे यांचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्षपद अवघ्या सहा महिन्यांतच गेले होते. त्यामुळे आता मुख्य कार्यकारिणीत सचिव पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. यावरून पक्षात सध्या ‘रडक्याचे डोळे पुसण्यात आले’ असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.






