ढोकी – धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे रात्रीच्या वेळी शेतात झोपण्यासाठी गेलेले ५१ वर्षीय सतीश शाहू कांबळे हे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
कसबे तडवळा (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी सतीश शाहू कांबळे (वय ५१ वर्षे) हे १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास गावातील बाबू शिंदे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. नातेवाइकांनी व कुटुंबीयांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना गुप्तपणे व गैरपणे डांबून ठेवण्यासाठी पळवून नेल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला.
ढोकी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंद
पतीचा सर्वत्र शोध घेऊनही कोणताही सुगावा न लागल्याने सतीश कांबळे यांच्या पत्नी अन्नपूर्णा सतीश कांबळे (वय ४६ वर्षे, रा. कसबे तडवळा) यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या प्रथम खबरेवरून ढोकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) (अपहरण) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.



