धाराशिव – धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथील २६ वर्षीय तरुण “धाराशिवला जाऊन येतो” असे भावाला सांगून घराबाहेर पडल्यानंतर परत घरी न आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा (अपहरण) संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
सोनेगाव (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी अभिषेक रामलिंग सुतार (वय २६ वर्षे) हा १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास सोनेगाव येथे होता.
त्यावेळी त्याने आपल्या सतीश नावाच्या भावाला सांगितले की, “तू सतीश सांगळे यांच्या शेडवर वेल्डिंगचे काम करण्यासाठी हाताखाली दुसरा गडी घे आणि काम चालू कर, मी धाराशिवला जाऊन येतो.” असे सांगून तो घरातून निघून गेला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्याला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी गैरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.
धाराशिव ग्रामीण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंद
अभिषेक सुतार याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचे वडील रामलिंग महादेव सुतार (वय ७६ वर्षे, रा. सोनेगाव) यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) (अपहरण) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.



