अणदूर (ता. तुळजापूर) : गावातील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ, अणदूर (ता. तुळजापूर) येथील ‘समस्त युवा ग्रामस्थांच्या’ वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुकारण्यात आलेले ‘ठिय्या आंदोलन’ मागील चार दिवसांपासून सलग सुरू आहे. प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची कोणतीही ठोस दखल न घेतल्याने तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार तरुणांनी व्यक्त केला आहे.
गावातील विविध गंभीर समस्यांबाबत युवा ग्रामस्थांनी यापूर्वी ३ जुलै २०२४ रोजी प्रशासनाला सविस्तर लेखी निवेदन दिले होते. मात्र, या निवेदनावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक कारवाई न झाल्याने, अखेर इशारा दिल्याप्रमाणे १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामपंचायतीसमोर हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू असूनही प्रशासनाच्या संथ व उदासीन कारभारामुळे गावकऱ्यांमधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
या आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
१) अतिक्रमण हटाव: अणदूरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सर्व अनधिकृत टपऱ्या आणि वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग तत्काळ हटवण्यात यावे.
२) डुकरांचा बंदोबस्त: शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या आणि लहान मुलांवर हल्ले करणाऱ्या मोकाट डुकरांचा त्वरित कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
३) स्वच्छता मोहीम: गावातील ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी.
४) अवैध दारूबंदी: गावात अनेक ठिकाणी उघडपणे आणि छुप्या मार्गाने सुरु असलेली अवैध व बेकायदेशीर दारू विक्री तत्काळ बंद करावी.
प्रशासनाला दिला इशारा:
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने केले जात आहे. मात्र, प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास किंवा दडपशाहीचा प्रयत्न केल्यास, तसेच यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा खणखणीत इशारा युवा ग्रामस्थांनी दिला आहे.





