धाराशिव – धाराशिवमध्ये ‘केंद्रीय विद्यालय’ स्थापन करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतलेला असतानाच, आता यावरून जिल्ह्यातील राजकारण आणि श्रेयवाद चांगलाच तापला आहे. “फुकटचे श्रेय घेण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जुनी खोड असून, केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत मात्र ते चांगलेच तोंडावर आपटले आहेत. कोणताही पाठपुरावा नसताना अर्धवट माहितीच्या आधारे पत्रक काढून श्रेय घेण्याचे धंदे त्यांनी बंद करावेत,” असा सणसणीत इशारा शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी दिला आहे.
रविवारी (दि. १९) प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनातून सोमनाथ गुरव यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
बातमीतील ठळक मुद्दे:
-
लोकसभेतील पाठपुरावा: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी २०२२ पासूनच या विषयासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असून, याची नोंद लोकसभेच्या इतिवृत्तातही (४ एप्रिल २०२२ रोजीचा प्रश्न) पाहायला मिळते.
-
लक्षवेधी आणि बैठका: नुसती हवेत पतंगबाजी न करता, २०२२ च्या लोकसभेच्या अधिवेशनात ओमराजे निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून लक्षवेधी मांडली होती. या अनुषंगाने दोन बैठकाही घेण्यात आल्या आहेत.
-
लोकसभेत पुन्हा आवाज उठवला : येणाऱ्या अधिवेशनात हाच प्रश्न करण्यात आला करण्यात आला असून, हा प्रश्न ९ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे. याच प्रश्नाची दखल घेत केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय पथकाची पाहणी हा त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे, अशी माहिती गुरव यांनी दिली.
-
मार्च २०२५ मधील प्रशासकीय बैठक: याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मार्च २०२५ मध्ये केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जागेची निवड, आवश्यक प्रस्ताव पाठवणे आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्यावर सविस्तर चर्चा झाली होती. हे सर्व शासकीय पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकते. त्यामुळे केवळ पत्रक काढून आपल्याला श्रेय मिळेल असे वाटणे, हा आमदार पाटील यांचा शुद्ध बालिशपणा आहे, असा टोला गुरव यांनी लगावला.
“घाईघाईत पत्रक काढून राहिलीसहिली अक्कल दाखवली”
आमदार राणा पाटील यांच्या पत्रकबाजीची खिल्ली उडवताना सोमनाथ गुरव म्हणाले की, “सगळ्यात हास्यास्पद आणि खोटारडेपणाची हद्द म्हणजे केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी कधी येणार, हे सांगण्याची आमदारांना इतकी घाई झाली की कोणतीही खातरजमा न करता त्यांनी प्रेस नोट काढली. यातून त्यांनी आपली राहिलीसहिली अक्कल दाखवून दिली आहे.”
प्रत्यक्षात, केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या जागेची पाहणी करण्यासाठी समिती २२ जुलै २०२६ रोजी धाराशिवमध्ये येणार आहे. “आता तारखेत बदल झाला आहे, असे सांगणारे आणखी एक पत्रक काढा, म्हणजे ते तुमच्या स्वभावाला अधिक शोभेल,” असा चिमटाही सोमनाथ गुरव यांनी राणा पाटील यांना लगावला आहे.





