भूम : ऊसतोडीसाठी घेतलेली उचलीची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून एका मजुराला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यात उघडकीस आली आहे. या जाचाला कंटाळून ४२ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रणजीत सर्जेराव सानप (वय ४२, रा. उळूप, ता. भूम, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी एकावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रणजीत सानप यांनी ऊसतोडीसाठी आरोपी औदुंबर ऊर्फ पिनू विष्णू दराडे (रा. रामेश्वर, ता. भूम) याच्याकडून पैशांची उचल घेतली होती. मात्र, काही कारणास्तव रणजीत यांनी ते पैसे परत केले नव्हते. याच रागातून आरोपी औदुंबर दराडे याने रणजीत यांना रामेश्वर येथे डांबून ठेवले आणि त्यांना बेदम मारहाण केली.
आरोपीकडून सतत होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रणजीत सानप यांनी बुधवारी (ता. ११) सायंकाळी सात ते गुरुवारी (ता. १२) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान बऱ्हाणपूर शिवारातील चौघुले यांच्या शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तानाजी पंडित सानप (वय १९, रा. उळूप, ता. भूम) यांनी गुरुवारी (ता. १२) दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपी औदुंबर ऊर्फ पिनू दराडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), १२७(२) (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे) आणि ११५(२) (मारहाण करणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भूम पोलीस करत आहेत.





