धाराशिव : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांच्यात सुरू असलेल्या कथित अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक सूचक संदेश प्रसिद्ध केला आहे. या संदेशातून त्यांनी पक्षातील मतभेद संघटनेच्या योग्य व्यासपीठावर मांडण्याचे आवाहन केले आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“मतभेद असू शकतात, पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमांतून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते.”
गेल्या काही दिवसांपासून आमदार राणा पाटील आणि ॲड. अनिल काळे यांच्यातील वादामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर जिल्हाध्यक्षांची ही पोस्ट महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय वर्तुळात या पोस्टकडे पक्षातील वाढत्या वादावर पडदा टाकण्याचा आणि कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. मात्र, जिल्हाध्यक्षांनी कोणाच्याही नावाचा थेट उल्लेख केलेला नसला तरी ही प्रतिक्रिया सध्याच्या घडामोडींशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे.






