धाराशिव: कागदोपत्री कारवाईचा बडगा दाखवायचा, पण प्रत्यक्षात कारवाईच्या वेळी मुख्य संशयितांना पाठीशी घालायचे… धाराशिव शहर पोलिसांचा असाच एक संशयास्पद प्रकार समोर आला आहे. तेरणा इंजिनेरींग कॉलेजजवळील हायवेवर सुमारे २५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली. या संपूर्ण तस्करीत पवन पौळ हाच मुख्य सूत्रधार असताना त्याला थेट ५ नंबरचा आरोपी बनवून, कारवाईदरम्यान घटनास्थळावरूनच सोडून दिल्याचा खळबळजनक आरोप आळणी ग्रामस्थांनी केला आहे.
२५ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दि. १२ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजताच्या सुमारास सोलापूर-हायवेवरील तेरणा इंजिनेरींग कॉलेजसमोर धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई केली. एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH-25 BF-3696) महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला ‘डायरेक्टर स्पेशल पान मसाला’ आणि ‘शॉट लक्झरी तंबाखू’ असा एकूण १० लाख ३६ हजार ८०० रुपयांचा गुटखा तसेच १५ लाखांची गाडी असा एकूण २५ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईप्रकरणी पोलीस अंमलदार शशिकांत जाधवर (बकल नं. १४५) यांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी पवन पौळला ५ नंबरचा आरोपी दाखवले; घटनास्थळावरूनच सोडून दिल्याने संताप!
या एफआयआरमध्ये खालीलप्रमाणे आरोपींची नावे नोंदवण्यात आली आहेत:
१) गणेश मारुतीराव धुमाळ (रा. बार्शी, सोलापूर)
२) रोहन कदम (रा. आळणी)
३) जाफर जमादार (रा. आळण, कर्नाटक)
४) अमोल गुंजाळ
५) पवन जीवन पौळ (रा. आळणी, ता. जि. धाराशिव)
ग्रामस्थांचा मुख्य आरोप:
ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, या गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार आणि सूत्रधार आरोपी हा पवन जीवन पौळ हाच आहे. परंतु, पोलिसांनी त्याला मुख्य आरोपी न करता मुद्दाम पाचव्या क्रमांकाचा आरोपी दाखवून गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला.
एवढेच नव्हे तर, दि. १२ जुलैच्या रात्री घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक दराडे यांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई सुरू असताना पवन पौळ तिथे आला होता. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्याऐवजी घटनास्थळावरूनच थेट सोडून दिले. मुख्य आरोपीला प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणावरून सोडून दिल्यामुळे शहर पोलिसांच्या भूमिकेवर आणि नियतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“पोलीस माझ्या खिशात आहेत!” — आळणी ग्रामस्थांचा आक्रोश
या सर्व संशयास्पद कारभाराविरोधात आणि पवन पौळच्या वाढत्या दहशतीविरोधात आज आळणी गावातील संतप्त ग्रामस्थांनी धाराशिव येथील पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयावर धडक मोर्चा काढला. SP कार्यालयासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
ग्रामस्थांचे गंभीर आरोप:
-
मुख्य आरोपीला अभय: गुटखा तस्करीत मुख्य आरोपी असलेल्या पवन पौळला पोलिसांनी एफआयआरमध्ये नाममात्र ५ नंबरचा आरोपी बनवून घटनास्थळावरून पसार होऊ दिले.
-
दहशत व अवैध धंदे: पवन पौळ हा गावात व परिसरात उघडपणे अवैध धंदे चालवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.
-
मुलींची छेडछाड: परिसरातील मुलींची व महिलांची छेडछाड करण्याचे गंभीर प्रकार त्याच्याकडून वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला.
-
पोलीस प्रशासनाचा माज: “पोलीस माझ्या खिशात आहेत, माझे कोणी काही करू शकत नाही,” अशी दर्पोक्ती तो उघडपणे करत फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
निष्पक्ष चौकशीची मागणी
एकीकडे २५ लाखांचा गुटखा पकडल्याचे श्रेय घ्यायचे आणि दुसरीकडे तस्करीच्या मुख्य सूत्रधाराला ५ नंबरवर ढकलून घटनास्थळावरूनच सुरक्षितपणे सोडून द्यायचे, या प्रकारामुळे धाराशिव पोलिसांच्या खाकी वर्दीवर डाग लागला आहे.
मुख्य आरोपी पवन पौळ याला घटनास्थळावरून कोणाच्या आशीर्वादाने सोडून देण्यात आले? एफआयआरमध्ये त्याला ५ क्रमांकावर का ढकलले गेले? या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि गुटखा माफियांमधील लागेबांध्यांची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आणि आरोपी पवन पौळवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आळणी ग्रामस्थांनी केली आहे.





