महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी माता… हे नाव उच्चारताच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचा ऊर अभिमानाने आणि श्रद्धेने भरून येतो. आई तुळजाभवानी हे केवळ दगडा-विटांचे मंदिर नाही, तर ते कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे, श्रद्धेचे आणि ज्वलंत अस्मितेचे सर्वोच्च शक्तिपीठ आहे. पण आज याच पवित्र शक्तिपीठाला प्रशासकीय अनागोंदी, भ्रष्टाचाराची कीड आणि सुरक्षा रक्षकांच्या मुजोरीचे ग्रहण लागले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ज्या पद्धतीने लुटले जात आहे आणि त्यांच्यावर हात उगारला जात आहे, ते पाहता तुळजापूर मंदिर व्यवस्थापन हे भक्तीचे केंद्र राहिले आहे की वसुलीचा आणि दादागिरीचा अड्डा बनले आहे? असा संतप्त सवाल आता महाराष्ट्राची जनता विचारू लागली आहे.
लुटारूंचा सुळसुळाट आणि प्रशासनाची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक
गेल्या काही महिन्यांपासून तुळजाभवानी मंदिर ज्या कारणांसाठी चर्चेत आहे, ती प्रत्येक महाराष्ट्राच्या मानहानीची बाब आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चाललेला व्हीआयपी दर्शनाचा काळाबाजार, बंद असलेल्या व्हीआयपी प्रवेशद्वारातून होणारी ‘अर्थपूर्ण’ दर्शन व्यवस्था, तात्काळ दर्शनाच्या नावाखाली भाविकांच्या खिशावर मारला जाणारा डल्ला आणि बोगस पुजाऱ्यांचा उच्छाद… हे सर्व काय दर्शवते? दोन बनावट पुजाऱ्यांवर नुकताच गुन्हा दाखल झाला, पण हे हिमनगाचे टोक आहे. या बोगस पुजाऱ्यांना आणि दलालांना राजाश्रय कोणाचा आहे? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांचे खिसे यातून भरले जात आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत.
रक्षक झाले भक्षक: भाविकांना मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी?
भ्रष्टाचाराने बरबटलेली ही व्यवस्था आता भाविकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल मारू लागली आहे. रविवारी (२८ जून) समोर आलेला व्हिडिओ हा संतापजनक आणि चीड आणणारा आहे. एका महिला भाविकेला आणि तिच्या पतीला महिला सुरक्षा रक्षकांकडून ज्या शिवराळ भाषेत शिवीगाळ झाली आणि जी अमानुष मारहाण करण्यात आली, ती पाहिल्यानंतर कोणत्याही स्वाभिमानी माणसाचे रक्त सळसळेल. देवीच्या दारात आलेला भाविक हा गुन्हेगार नाही. त्याच्यावर हात उचलण्याची, त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवण्याची हिंमत या सुरक्षा रक्षकांमध्ये येतेच कुठून?
प्रशासनाचे निर्लज्ज स्पष्टीकरण
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे या घटनेनंतर मंदिर प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण! “मानवतावादी दृष्टिकोनातून आत सोडले, पण ते बाहेर न आल्याने धक्काबुक्की झाली,” हा प्रशासनाचा युक्तिवाद निव्वळ हास्यास्पद आणि स्वतःच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालणारा आहे. जर भाविक नियम मोडत असतील, तर त्यांना बाहेर काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. ‘मानवतावादी’ दृष्टिकोनाचा आव आणणारे प्रशासन, मारहाण करताना मात्र तालिबानी वृत्ती का दाखवते? सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेसाठी लावले आहेत का? जर सीसीटीव्हीमध्ये सर्व कैद आहे, तर चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा का? दोषींवर थेट बडतर्फीची कारवाई का केली जात नाही?
पैसे मोजूनही मिळतात धक्के आणि अपमान
ही काही पहिलीच घटना नाही. २३ जून रोजी अॅड. तन्मयी मिलिंद वालावलकर यांनी उघडकीस आणलेला प्रकार तर याहून भयंकर आहे. त्यांनी ऑनलाइन ‘स्पेशल देणगी दर्शन’चे अधिकृत बुकिंग केले होते. म्हणजेच, प्रशासनाच्या तिजोरीत पैसे जमा करूनही या महिलांना गाभाऱ्यात महिला सुरक्षा रक्षकांच्या अरेरावीचा, धक्काबुक्कीचा आणि अमानुष वर्तनाचा सामना करावा लागला. त्यांच्यासोबतच्या ज्येष्ठ नागरिकांनाही सोडण्यात आले नाही, यात एका महिलेला दुखापतही झाली. पैसे उकळायचे आणि वरून लाथा खायच्या, हा कोणता न्याय आहे? तक्रार देऊनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? कुणाला पाठीशी घातले जात आहे?
पांढरे हत्ती पोसायचे कशाला?
तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष खुद्द जिल्हाधिकारी आहेत. दैनंदिन कारभारासाठी तहसीलदार दर्जाचा अधिकारी तिथे ठाण मांडून असतो. तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण, शेकडो पोलिसांचा फौजफाटा, सीसीटीव्हीचे जाळे आणि सुरक्षेचा मोठा गाजावाजा… एवढी मोठी यंत्रणा जर एक साधी दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवू शकत नसेल आणि भाविकांचे रक्षण करू शकत नसेल, तर हा प्रशासकीय ‘पांढरा हत्ती’ पोसायचा कशाला? हा सर्व फौजफाटा केवळ ‘मलिदा’ लाटण्यासाठी बसला आहे का?
आता कृती हवी, केवळ आश्वासने नकोत!
आई तुळजाभवानीच्या दरबारात येणारा प्रत्येक भाविक हा अतिथी आहे. त्याच्या श्रद्धेचा बाजार मांडून त्याला अपमानित करण्याचा अधिकार ना कोणत्या अधिकाऱ्याला आहे, ना कोणत्या सुरक्षारक्षकाला.
प्रशासनाने आता खालील पावले तत्काळ उचलायला हवीत:
-
दोषींवर गुन्हे दाखल करा: भाविकांना मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना केवळ ‘चौकशीत’ न ठेवता तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा.
-
व्हीआयपी रॅकेटचा पर्दाफाश करा: दर्शनाच्या नावाखाली चालणाऱ्या दलाल आणि बोगस पुजाऱ्यांच्या साखळीची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तुरुंगात डांबा.
-
जबाबदारी निश्चित करा: वारंवार घडणाऱ्या या गैरप्रकारांची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी जनतेला उत्तर द्यावे.
महाराष्ट्राची जनता अत्यंत सहनशील आहे, पण ती आपल्या दैवताचा आणि दैवताच्या दरबारातील भक्तांचा अपमान कधीही खपवून घेणार नाही. जर राज्य सरकारने आणि प्रशासनाने या मुजोर प्रवृत्तींना वेळीच ठेचले नाही, तर भाविकांचा उद्रेक होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या निगरगट्ट प्रशासनाची असेल. कुलस्वामिनीच्या नावाला काळिमा फासणाऱ्या या प्रवृत्तींचा आता समूळ नायनाट करण्याची वेळ आली आहे!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह





