धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पिकांची वाढ खुंटली, उत्पादनात मोठ्या घटीची शक्यता
धाराशिव हा प्रामुख्याने कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेला जिल्हा आहे. सध्या सोयाबीन पीक फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अत्यंत नाजूक अवस्थेत असतानाच पावसाचा दीर्घ खंड पडला आहे. यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला असून वाढत्या उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. अनेक भागांत पिके हिरवी दिसत असली, तरी पाण्याचा ताण पडल्यामुळे फुले व शेंगा गळून पडत आहेत. परिणामी, यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे अर्थकारण संकटात
शेतकरी कुटुंबांचा दैनंदिन उदरनिर्वाह, पुढील हंगामाचा खर्च आणि मुला-मुलींचे उच्च शिक्षण हे सर्वस्वी खरीप पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन बुडाल्यास त्यांच्या मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणावर गंभीर परिणाम होईल, अशी चिंता आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली.
तातडीने आदेश देण्याची मागणी
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील ज्या भागांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडला आहे, त्या सर्व ठिकाणी महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करावी. प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश देऊन सर्व पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक भरपाई मंजूर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्याची विनंती आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.






