धाराशिव: कळंब तालुक्यातील चोराखळी येथील ‘महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र’ अखेर प्रशासकीय आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या या केंद्रावर कारवाई करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले होते.
या कला केंद्राचे चालक राजाभाऊ सिताराम माळी यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने २८ एप्रिल २०२५ रोजीच नामंजूर केला होता. या निर्णयाविरोधात माळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ९ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी अंतिम आदेश पारित केल्यानंतर प्रशासनाने ही कडक कारवाई केली आहे.
कारवाईची प्रमुख कारणे:
-
परवानगीचा अभाव: केंद्राचा अधिकृत अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला असूनही केंद्र बेकायदेशीरपणे सुरू होते.
-
नियमबाह्य कामकाज: उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालात कला केंद्रामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले होते.
-
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न: केंद्रावर विविध गुन्हे दाखल झाल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस अधीक्षकांनी वर्तवली होती.
स्थळावरच झाला पंचनामा


जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, कळंबचे तहसीलदार, येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि शासकीय पंचांच्या उपस्थितीत चोराखळी येथे जाऊन हे केंद्र प्रत्यक्ष बंद करण्यात आले. केंद्राला टाळे ठोकल्यानंतर त्याचा रीतसर पंचनामा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे जर हे कला केंद्र अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.








