धाराशिव – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा धाराशिवकरांना एक नवं स्वप्न दाखवलं आहे. कौडगाव एमआयडीसीमध्ये आता चक्क दारुगोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा कारखाना (डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब) उभारण्यात येणार असल्याची ‘बॉम्ब’रूपी घोषणा त्यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली. निबे लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून तब्बल दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि २००० विविध प्रकारच्या अभियंत्यांना रोजगार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एवढंच नाही, तर इथे आधी नियोजित असलेला ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ आता अन्य एमआयडीसीत हलवणार असल्याचंही त्यांनी अगदी सहज सांगून टाकलं.
आमदार साहेबांच्या घोषणांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’
आमदार साहेबांच्या या नव्या घोषणेवर आता जिल्ह्यातून मिश्किल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राणा पाटलांच्या घोषणांचा इतिहास पाहिला, तर त्यांच्या घोषणा केवळ ‘हवेतच’ विरतात, अशी टीका आता उघडपणे होऊ लागली आहे.
-
पहिलं गाजर: सुरुवातीला धाराशिवमध्ये ‘लेदर पार्क’ उभारण्याच्या मोठ्या वल्गना झाल्या. तो पार्क कागदावरच राहिला.
-
दुसरं गाजर: त्यानंतर कौडगावमध्येच ‘टेक्निकल टेक्स्टाईल पार्क’ उभारणार असल्याचं सांगण्यात आलं. आता खुद्द आमदारांनीच तो दुसरीकडे हलवणार असल्याची कबुली दिली आहे.
-
तिसरं गाजर: आणि आता थेट ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ आणि दारुगोळा कारखान्याची घोषणा!
कधी लेदर, कधी कापड तर कधी दारुगोळा… धाराशिवकरांच्या हातावर फक्त नवनवीन घोषणांचीच तुळशीपत्रं ठेवली जात आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
“सगळ्या कंपन्या बंद पडत्यात काय की…” – सोमनाथ गुरवांची मिश्किल टिप्पणी
राणा पाटलांच्या या दोन हजार अभियंत्यांना रोजगार देण्याच्या घोषणेची आता सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी फेसबुकवर एक खोचक पोस्ट करत आमदारांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.


गुरव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अतिशय मिश्किल शब्दांत टोला लगावला आहे:
“धाराशिव मध्ये २००० हजार केमिकल इंजिनियर पाहिजेत, सगळ्या कंपन्या बंद पडत्यात काय कि 😜”
सोमनाथ गुरव यांचा हा टोला सध्या चांगलाच व्हायरल होत असून, ‘कागदावरचे इंजिनिअर आणि हवेतले कारखाने’ यावर धाराशिवकर मनसोक्त हसत आहेत. एकंदरीत काय, तर धाराशिवच्या विकासाचं हे ‘मॉडेल’ फक्त घोषणांच्याच फैरी झाडणार की प्रत्यक्षात कौडगावच्या माळरानात एखादी वीट तरी रचली जाणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.




